मुरुम येथील जुना बंधारापूल पाण्याखाली : शेतीपंपांचा वीजपुरवठा बंद
वाघळवाडी- भाटघर, वीर, गुंजवणी, नीरा देवघर धरणातून विसर्ग सुरू असल्याने नीरामाईला पूर आला असून मुरूम (ता.बारामती) येथील नीरा नदीवरील जुना बंधारा पूल पाण्याखाली गेला असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर नीरा नदीकाठी असणाऱ्या शेती पंपांची वीजपुरवठा दक्षता म्हणून बंद करण्यात आलेले आहे.
नीरा नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरले असून ऊस इतर पिकांची या पाण्यामुळे नासाडी झाली आहे. रविवारी (दि. 4) वीर धरणातील विसर्ग 61 हजार क्युसेक्स आहे. तथापी यामाध्ये ओढे-नाले यांचा विसर्ग मिसळत आहेत. तसेच गुंजवणी व नीरा देवघर धरणांचा विसर्ग सुरू असून भाटघर धरणातून 21 हजार क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने वीर धरणामधील विसर्गात वाढ करावा लागल्याने तो 76 हजार क्युसेक्सपर्यंत गेला आहे.
नीरा नदीवरील पूल व सखल भागातील नागरी वसाहतींची ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, नदीकाठी ठिकठिकाणी पाण्याच्या वेगाच्या प्रवाहामुळे वीज खांब कलले असून ते कधीही कोसळतील या स्थितीत आहेत, तर पूर ओसरल्यानंतर या सर्व विद्युत खांबांची दुरुस्ती केली जाणार असल्याचे वीज मंडळाकडून सांगण्यात आले आहे.