धरणातून 21000 क्युसेक पाण्याचा विसर्ग
भोर/भाटघर – मुसळधार पावसामुळे तालुक्यातील ब्रिटीशकालीन भाटघर धरण रविवारी (दि. 4) सायंकाळी 4.20 वाजण्याच्या सुमारास 100 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाच्या स्वयंचलित 45 मोऱ्यांमधून सुमारे 21 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला, अशी माहिती भाटघर धरण प्रशासनाचे शाखा अभियंता अनिल नलावडे यांनी दिली.
गेल्या वर्षी 14 ऑगस्ट रोजी भाटघर धरण भरले होते. या वर्षी मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे 4 ऑगस्ट रोजी धरण भरले आहे. भाटघर धरण 1913 साली उभारण्यात आलेले असून धरणाचे संपूर्ण बांधकाम चिरेबंदी दगडात केलेले आहे. 1 कि.मी. लांबीच्या धरणास एकूण 108 मोऱ्या असून यातील 45 मोऱ्या स्वयंचलित आहेत.
तालुक्यात गेल्या 10-12 दिवसांपासून अतिवृष्ठी होत असल्यामुळे भाटघर आणि नीरादेवघर धरण पूर्ण क्षमतेने भरली असल्यामुळे नीरा नदीला पूर आला आहे. त्यामुळे नीरादेवघर धरणातून दोन दिवसांपासून सुमारे 12 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आपटी येथील नीरा नदीवरील भावेखल गावाला जोडणाऱ्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तर भोलावडे गावच्या हद्दीतील निरामाता वाळवंट मंदिर पाण्यात बुडाले असून भोरच्या राजवाडा चौकात पाणी शिरले आहे. तसेच जुन्या स्मशानभूमिला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. पद्मावती वस्तीकडे जाणारा रस्ता जलमय झाला आहे. भोर शहरातील निरानदीच्या घाटावर पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
भाटघर धरण 100 टक्के भरल्याने 21 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यसात आला. त्यामुळे वीर धरणातून 70 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. दरम्यान, धरण प्रशासनाने पूर्व भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास भाटघर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला जाईल, असे शाखा अभियंता अनिल नलावडे सांगितले.