नवी मुंबई: पर्यावरणाला घातक असलेल्या प्लॅस्टीकविरोधात शासन आणि स्वयंसेवी संस्थांकडून रान उठवले जात असताना आणि इको-फ्रेण्डली गणेशमूर्तींची वाढती लोकप्रियता असल्याच्या काळात मुंबईतील एका खासगी शॉपिंग मॉलमध्ये पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या वापरुन एक गणेशमूर्ती साकारली असून यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत मोहिमेला चालना देण्यात आली आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी तब्बल 10,800 प्लॅस्टीक बाटल्या वापरण्यात आल्या आहेत, हे विशेष. तसेच मूर्तीसाठी वापरण्यात आलेल्या प्लॅस्टिक बाटल्यांपासून ल्युब्रिकंट इंधन तयार केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
या उपक्रमासाठी सदर मॉलला रुद्र एन सोल्युशन्स या निरुपयोगी प्लॅस्टिकच्या व्यवस्थापनातील संस्थेचे सहकार्य लाभले असून, ही संस्था मूर्तीसाठी वापरण्यात आलेले 300 किलोपेक्षा जास्त प्लॅस्टिक रिसायकल करणार आहे. ख्यातनाम कलाकार आबासाहेब शेवाळे आणि त्यांच्या चमूने ही मूर्ती बनवली आहे. पाण्याच्या या रिकाम्या बाटल्यांना लाल, काळा, निळा, हिरवा, पिवळा आणि पांढरा असे रंग देऊन अवघ्या चार दिवसात त्यापासून मूर्ती साकारण्यात आली. या अनोख्या उपक्रमासाठी नागरिकांकडून वर्गणीस्वरुपात रिकाम्या बाटल्या द्यायचे आवाहन करण्यात आले होते.
दरवर्षी श्रीगणेशाच्या आगमनाने कोट्यवधी लोकांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते. परंतु आजच्या काळात प्लॅस्टिकचा वाढलेला वापर आणि प्लॅस्टिक कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन यामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. जबाबदारीच्या भावनेने काम करणारे कॉर्पोरेट या नात्याने या मॉलने आपल्या सर्व ग्राहकांना प्लॅस्टिकच्या हानिकारक परिणामांची तसेच प्लॅस्टिक कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनाची माहिती करवून देण्याचे ठरविले आहे. प्लॅस्टिकचे योग्य व्यवस्थापन ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे हा संदेश या उपक्रमातूनदिला जात आहे