पिंपरी – राजकारण सर्वसामान्यांसाठी नाही, असा समज आजच्या तरुणाईमध्ये आहे. त्यामुळे काहीजण त्यापासून दूर जातात. मात्र, राजकारणात युवकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे मत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी व्यक्त केले.
दै. प्रभातच्या पिंपरी कार्यालयातील गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते. या वेळी बोलताना इम्रान शेख म्हणाले, “”नागरिकांचे सामाजिक आणि नागरी प्रश्न सोडविण्यासाठी पैसे लागत नाही. तरुणाईला बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतोय. केंद्र सरकारने दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आठ वर्षांत सोळा कोटी रोजगार देणे गरजेचे होते. आता तर लोकांनी नोकरी शोधणेच सोडून दिले आहे. सध्याच्या युवकांमध्ये जातीयवादीपणा आणण्याचा प्रयत्न काही पक्ष करीत आहेत. मात्र, आम्ही बेरोजगारांसाठी शिबिरे आयोजित करतो. यासाठी स्थानिक उद्योजकांची मदत घेत आहोत.”
प्रत्येक प्रभागातच नव्हे तर बूथपर्यंत कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. नगरसेवकांना पर्यायी कार्यकर्त्यांचे बळ युवकांच्या माध्यमातून निर्माण केले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये तरुणांना सर्वाधिक संधी दिली जाईल आणि कमीत कमी 20 युवक नगरसेवक महापालिकेत दिसतील. देशाला हेवा वाटेल असे शहर अजित पवार यांनी उभारले होते. मात्र गेल्या पाच वर्षांत भाजपच्या काळात शहराची वाट लागली आहे. भाजपने अनेक भ्रष्टाचार केले आहे. भाजपरूपी आलेले हे विघ्न दूर कर, अशी प्रार्थना आपण गणरायला केल्याचेही इम्रान शेख यांनी सांगितले.