कुडाळ -जावळी-महाबळेश्वर बाजार समिती निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, गुरुवारी सहा जागा बिनविरोध करण्यात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील आणि आ. शशिकांत शिंदे यांना यश मिळाले; परंतु ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध करण्याचे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले असून, 12 जागांसाठी 22 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकमेकांच्या गळ्यात गळे घातल्याचे स्पष्ट झाले आहे.
कृषी पतपुरवठा व बहुउद्देशीय संस्था मतदारसंघात सर्वसाधारण सात जागांसाठी गणेश कवी, रवींद्र गोळे, लक्ष्मण जाधव, भास्कर पवार, मधुकर पोफळे, राजेंद्र भिलारे, सर्जेराव मर्ढेकर, मच्छिंद्र मुळीक, हनुमंत शिंगटे, जयदीप शिंदे, प्रमोद शिंदे, हेमंत शिंदे, प्रमोद शेलार, ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वसाधारण दोन जागांसाठी बजरंग गुजर, गुलाब गोळे, साईबाबा जगताप, बुवासाहेब पिसाळ, व्यापारी/आडते मतदारसंघात दोन जागांसाठी दत्तात्रय कदम, प्रकाश जेधे, रमेश सपकाळ, ग्रामपंचायत मतदारसंघात अनुसूचित जातीजमातीच्या एका जागेसाठी विद्या कदम,
पांडुरंग कारंडे हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कृषी पतपुरवठा व बहुउद्देशीय संस्था मतदारसंघातील महिला प्रतिनिधी कमल दळवी व योगिता शिंदे, इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी मनेश फरांदे, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रतिनिधी तुकाराम शिंदे, ग्रामपंचायत मतदारसंघात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रतिनिधी रामचंद्र भोसले, हमाल/मापाडी मतदारसंघात सुंदर भालेराव हे बिनविरोध झाले आहेत. यामध्ये आ. शिवेंद्रसिंहराजे गट आणि आ. शशिकांत शिंदे व अमित कदम यांच्या गटाचे प्रत्येकी तीन उमेदवारांचा समावेश आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या बाजार समितीची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होण्यासाठी आ. शिवेंद्रसिंराजे, आ. शशिकांत शिंदे व आ. मकरंद पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधला. पक्षीय हेवेदावे बाजूला ठेवून तिन्ही आमदार, समर्थक एकत्र आले.
मात्र, यात शिवसेनेच्या दोन्ही गटांचा विचार न झाल्याने, त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज मागे घेताना आ. शिवेंद्रसिंहराजे स्वतः सहाय्यक निबंधक कार्यालयात उपस्थित होते. सपोनि संतोष तासगावकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वसंतराव मानकुमरे, अमित कदम, राजेंद्र राजपुरे, ज्ञानदेव रांजणे, संजय गायकवाड, सुरेश पार्टे, शिवाजीराव देशमुख, नारायण शिंगटे, प्रकाश कदम, अरविंद जवळ, सागर धनावडे, रवी शेलार, आनंदा कांबळे, आनंदा परिहार, विलास दुंदळे, विठ्ठल पवार, सोमनाथ कदम, समीर डांगे, संदीप पवार, मोहन देशमुख, महादेव ओंबळे, बाळासाहेब ओंबळे यांनी बिनविरोध उमेदवारांचे अभिनंदन केले. दि. 30 रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख यांनी दिली. दरम्यान, माजी आमदार सदाशिव सपकाळ, जि. प.चे माजी सदस्य दीपक पवार, शिवसेनेच्या दोन्ही गटांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. तीन आमदार एकत्र येऊनही निवडणूक बिनविरोध करण्यात त्यांना अपयश आले. वसंतराव मानकुमरे यांची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे दीपक पवार म्हणाले.