जेजुरी(शिवराज झगडे) – “सदानंदाचा येळकोट’… “येळकोट येळकोट जयमल्हार’…चा जयघोष आणि भंडाऱ्याची उधळण करत सुमारे चार लाख भाविकांनी जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेत सोमवती यात्रेचा कुलधर्म -कुलाचार केला. सोमवारी (दि. 30) पूर्ण दिवस सोमवती अमावस्येचा असल्याने रविवारपासूनच जेजुरी नगरीत गडकोट, पायरीमार्गावर भाविकांची गर्दी झाली होती.
सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास भाविकांना मंदिर देवदर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रमुख वतनदार इनामदार पेशवे यांनी आदेश देताच घडशी समाजबांधवाच्या पारंपरिक सनई-चौघड्याच्या मंगलमय सुरात आणि भाविकांच्या भंडारा उधळणीत “श्रीं’च्या पालखी सोहळ्याने गडकोट आवारातून कऱ्हास्नानासाठी प्रस्थान ठेवले.
समस्त ग्रामस्थ-खांदेकरी मानकरी, सेवेकरी पुजारी-सेवेकरी वर्ग, देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त तुषार सहाणे, विश्वस्त राजकुमार लोढा, शिवराज झगडे, पंकज निकुडे-पाटील, अशोकराव संकपाळ, संदीप जगताप, प्रसाद शिंदे, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे आदी उपस्थित होते. छत्रचामरे, अब्दागिरी पुढे मानाचा “श्रीं’चा पंचकल्याणी अश्व असलेला गडावरून मार्गस्थ झालेला पालखी सोहळा शहरातील ऐतिहासिक मल्हार गौतमेश्वर मंदिरावर स्थिरावला.
तेथून पुढे जामा मशीदीसमोर पानसरे परिवार (मुस्लीम बांधव) यांचा पानाच्या विड्याचामान, भंडाऱ्याची उधळण स्वीकारत सोहळा कऱ्हास्नानासाठी मार्गस्थ झाला. दुपारी 3.30ते 4 चे दरम्यान कऱ्हानदीतीरी पापनाश तीर्थावर (रंभाई शिंपींन कट्टा) खंडोबा-म्हाळसादेवी उत्सव मूर्तींन दही दुधाने विधिवत अभिषेक करीत कऱ्हास्नान घालण्यात आले. त्याचबरोबर अनेक भाविकांनी स्नानाची पर्वणी लुटली.
धार्मिक विधीनंतर धालेवाडीकर ग्रामस्थांचा व दवणेमळा येथे फुलाई माळीण कट्टा येथील मान घेत सोहळा शहरामध्ये जानाई मंदिर येथे स्थिरावला. तद्नंतर रात्री उशिरा पुन्हा गडकोटावर दाखल झाल्यानंतर रोजमुरा (तृणधान्य )वाटप होऊन सोमवती उत्सवाची सांगता झाली. पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय जाधव पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मागर्दशनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अडीच वर्षांनंतर यात्रेचा लाभ –
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 2020मध्ये प्रशासनाकडून सर्व जत्रा यात्रा उत्सवांमध्ये भाविकांना निर्बंध घालण्यात आले होते, त्यामुळे ग्रामस्थ ,मानकरी यांच्या मोजक्या उपस्थितीमध्ये श्रींचे धार्मिक विधी केले जात होते; मात्र सध्या प्रशासनाकडून सर्व निर्बंध हटविण्यात आल्याने राज्याच्या विविध प्रांतातून भाविक उत्साहाने जेजुरीत दाखल झाला होता. जागरण गोंधळ विधी, तळी भंडारा, भंडारा उधळण आदी विधींसह खंडेरायाचा गजर शहरामध्ये घुमत होता. प्रसादपुडे, खेळणी, मिठाई, हार-फुले, भंडारा खोबरे यांची दुकाने सजली होती.
देवसंस्थानकडून यात्रेचे नियोजन –
भर दुपारच्या सुमारास कऱ्हास्नान असल्याने पालखी सोहळ्यातील खांदेकरी मानकरी ग्रामस्थांसाठी पायमोजे व टोप्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.कऱ्हास्नान मार्गावर अल्पोपहार, पाण्याच्या बाटल्याची सुविधा करण्यात आली होती. गडकोट आवाराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती , रांजणगाव येथील पाचूदकर पाटील यांनी मुख्य गाभारा फुलांनी सजवला होता.
फोटोग्राफी व्यावसायिकांचा पत्रकारांना त्रास –
पालखी सोहळा चित्रीकरण, मंदिराचे फोटो काढण्यासाठी मुंबई येथून काही व्यावसायिक गडकोट आवारात दाखल झाले होते. याचा मोठा त्रास स्थानिक पत्रकार व वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना बसला. दोन व्यवसायिकांनी तर देवसंस्थानची, पोलीस प्रशासनाची परवानगी न घेता ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे ड्रोन देवसंस्थान व्यवस्थापनाने ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.