लोणी काळभोर,(वार्ताहर)- यशवंत’ची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच बिनविरोध व्हावी या दृष्टीने ज्येष्ठ नेते माधव काळाभोर, सभापती दिलीप काळभोर, सुरेश घुले, महादेव कांचन व आम्ही सर्व मंडळींनी पुढाकार घेतला. राजकीय मतभेद असतानासुद्धा विरोधी गटाला बैठकांना बोलावून बिनविरोध निवडणुकीसाठी अथक परिश्रम घेतले;
परंतु राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उतावीळ झालेल्या मंडळींनी या प्रयत्नांना खो घातला, अशी टीका महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर यांनी केली आहे या संदर्भात सविस्तर बोलताना पै. राहुल काळभोर म्हणाले, राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने ’यशवंत’ला जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी अथक प्रयत्न करणार आहोत.
या कामी देशाचे सहकार मंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्यामार्फत प्रयत्न करणार आहे. नुकतेच केंद्र सरकारने देशभरातील 33 सहकारी साखर कारखान्यांच्या 1378 कोटी थकित कर्जाची पुनर्रचना करण्यास मान्यता दिली आहे. त्यातील 619 कोटींचे व्याज हे पूर्णपणे माफ केलेले आहे.
तसेच महाराष्ट्रातील 20 कारखान्यांच्या 861 कोटी रुपयांच्या कर्जाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. या धर्तीवरच केंद्र व राज्य सरकारची मदत घेऊन यशवंत सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. ज्येष्ठ नेते माधव काळभोर यांनी सांगितल्याप्रमाणे यशवंत सहकारी कारखान्याची एक इंचही जमीन न विकता राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासाठी पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची मदत घेण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.
कारखान्यातील जुने युनिट दुरुस्त करणे किंवा प्रतिदिन 2000 मे. टनाचे नवीन युनिट उभारण्याचे नियोजन आहे. कामगारांचे थकलेले वेतन व शेतकर्यांची प्रलंबित ऊसबिल देणे, ऊसतोड वाहतूकदारांचे थकलेले पैसे देणे याला आमची प्राथमिकता राहील.
मयत सभासदांच्या वारसांची नोंद करून सभासदांच्या मुलांसाठी विविध योजना राबविणार आहे. नावाने यशवंत असणार्या आपल्या कारखान्याला पुन्हा गत वैभव प्राप्त करून द्यायचे आहे. विरोधकांनी प्रचार सभांमध्ये टीका करण्यावर भर दिला असून रयत सहकार पॅनलने कारखाना सुरू करण्यावर भर देत त्याचे नियोजन आखले आहे राहुल काळभोर यांनी सांगितले.
सर्वपक्षीय उमेदवारांचा पॅनल
पॅनलची रचना करताना 90 % तरुण, सुशिक्षित व सहकाराची जाण असणारी मंडळी व 10 टक्के सहकारातला अनुभव असणारी मंडळी असे समीकरण करून सर्वपक्षीय उमेदवारांचा पॅनल तयार केला आहे. तालुक्यातील जनतेने यशवंत सुरू करण्यासाठी व निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचे प्रयत्न पाहिलेले आहेत.
त्यामुळे येणार्या 9 तारखेला अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल प्रचंड बहुमताने विजय होणार आहे. यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठीचे ध्येय, दृष्टिकोन व नियोजन आमच्याकडेच असून कुठल्याही परिस्थितीत यशवंत सुरू करणारच असा आत्मविश्वास महाराष्ट्र केसरी पै राहुल काळभोर यांनी व्यक्त केला.