महाभारताचं युद्ध सुरू होण्याच्या बेतात आहे. कौरव-पांडव समोरासमोर शत्रू म्हणून उभे ठाकले आहेत. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य कृष्णाकडे आहे. सप्तअश्वांचे लगाम श्रीकृष्णाच्या हातात ताणलेले आहेत. त्यांचा रथ भरधाव वेगानं पुढे जात आहे. मागे अर्जुनही धनुष्याची प्रत्यंचा ताणून शत्रूसेनेवर नेम धरतोय… असं लाल कापडावर पिवळट रंगात काढलेलं चित्र फ्रेम करून घराच्या भिंतीवर टांगलेलं होतं. ते चित्र नुसतं पाहायलाच किती वेळ लागायचा! कारण त्यात तितकं बारीक काम केलेलं होतं. हस्तकलेचा तो एक उत्कृष्ट नमुनाच होता. त्यानंतर अनेक वर्षांनी त्याला कलमकारी म्हणतात असं कळलं. वेगवेगळ्या प्रकारांनी कापड सुशोभित करायची कला जगभरात अनेक प्रकारांनी उदयाला आली. त्याचे दोन मुख्य प्रकार पडतात. एक म्हणजे सुरुवातीपासून वेगवेगळ्या रंगाचे धागे वापरून धाग्यांचं वस्त्र विणतानाच त्यावर वेगवेगळ्या प्रकारची नक्षी तयार करायची. दुसरा प्रकार म्हणजे तयार वस्त्रावर वेगवेगळ्या चित्रांचे ठसे उमटवायचे, त्यावर चित्रं काढायचे किंवा कापड विशिष्ट प्रकारे बांधून त्यातून नक्षी तयार करायची.
कापड रंगवण्याचा हा इतिहास पाहिला तर तो आपल्याला तीन हजार वर्षं मागे घेऊन जातो. इसवीसनाच्या तिनशे वर्षं आधी अलेक्झांडर द ग्रेट जेव्हा भारतात पहिल्यांदा आला होता. तेव्हा भारतातल्या लोकांच्या अंगावरचे रंगीबेरंगी कपडे पाहून तो आश्चर्यचकित झाला होता आणि परत जाताना त्यानं काही कपड्यांचे नमुने आपल्यासोबत घेऊन गेला होता. मग तशाच प्रकारच्या भारतातल्या कपड्यांना इजिप्त, ग्रीस आणि इतर देशांतून मागणी यायला लागली आणि अशा प्रकारे भारतातून रंगीत कापड परदेशी जायला लागले. तेव्हाचं हे कापड म्हणजे हातानं चितारलेले देखावे आणि चित्र असलेलं कलमकारी कापड होतं.
लेखनकला येण्याआधी आपल्याकडे पूर्वी कथाकार, कीर्तनकार लोक स्वत:च गावोगावी फिरून रामायण, महाभारत आणि पुराणांतल्या कथा सांगत फिरायचे. आपल्या कथा अजून रसपूर्ण होण्यासाठी ते चित्रकारांनाही आपल्यासोबत घेऊन फिरायचे. मग हे चित्रकार त्या त्या कथा आपल्या चित्रांतून कापडावर उतरवायचे. अशा प्रकारे कलमकारी शैलीचा उगम झालेला दिसतो. या प्रकारातल्या कापडाचे काही अवशेष मोहेंजोदडोमध्येही मिळाले आहेत.
कलमकारी हा शब्दच मुळात इराणनं आपल्याला दिलाय. इराणी म्हणजेच पारशी भाषेत कलम म्हणजे पेन आणि कारी म्हणजे कारागिरी किंवा कलाकारी. तर या कलमकारीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कापडावर हातानं अत्यंत कलाकुसरींची चित्रं काढली जातात आणि ती रंगवली जातात.
भारतात ही कला फार पूर्वीपासून होती. नंतरच्या काळात ती इतस्त: पसरून कमी झाली होती, पण मुघलकाळात गोवळकोंड्याच्या सल्तनतमध्ये ही कला 16 व्या शतकात सुवर्णमुखी नदीच्या काठी बहरली. मुघलांनी या भटक्या चित्रकारांना एका ठिकाणी स्थायिक केलं आणि या प्रकाराला वाहतं पाणी मोठ्या प्रमाणात लागतं त्यामुळे हे कलाकार खळाळून वाहणाऱ्या दक्षिणेकडच्या सुवर्णमुखी नदीकाठी वसले. आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणातली अनेक कुटुंबं कलमकारी प्रकारची वस्त्रं तयार करून आपली उपजीविका करतात.
कलमकारीमध्ये दोन प्रकार पडतात एक म्हणजे श्रीकलाहस्ती आणि मछलीपट्टणम्. श्रीकलाहस्तीमध्ये रामायण, महाभारत, गणेशपुराण, विष्णूपुराणातल्या देवदेवतांच्या कथांमधले प्रसंग हातानं काढलेले असतात. तर मछलीपट्टणम् या प्रकारात वेगवेगळ्या लाकडी ठोकळ्यांनी कापडावर पानं, फुलं, प्राणी, पक्षी अशी आधीच कोरून ठेवलेल्या नक्षीचे छाप उमटवतात आणि मग त्यावर हातानं रंग भरतात. या छापांना बाटिक प्रिंटिंग असंही म्हटलं जातं. या कलमकारी केलेल्या कपड्यांमध्ये रेशमी किंवा मलमल सुतीचं कापड जास्त प्रमाणात वापरतात. कलमकारीच्या साड्या, दुपट्टे आणि कुर्ते प्रसिद्ध आहेत.
हातानं काढलेल्या मोठे डोळे असलेल्या हसऱ्या चेहऱ्याच्या गोलाकार आकृत्या, वाटोळ्या आकराची पानं, फुलं किंवा नागमोडी वळणं घेत गेलेली वेलबुट्टी अशा प्रकारच्या मोहक आकृत्या त्याच त्या ठराविक आकार, प्रकारात आणि एकाच प्रकारामध्ये दिसणाऱ्या कपड्यांपेक्षा कलमकारी आपला वेगळा छाप सोडून जाते हे नक्की. (क्रमशः)
अमृता देशपांडे