भारताने जगाला शांतता आणि समता यांचा संदेश दिला. या शांततेचे आणि समतेचे थोर उपासक म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर ही जयंती. गांधीजीच्या जीवनविषयक तत्वज्ञानात सत्याला केंद्रीय स्थान होते. गांधीजींनी आपल्या आत्मकथेत म्हटले आहे “” माझे सत्य हे स्थूल वाचिक सत्य नव्हे तर जसे वाचेचे तसेच विचारांचेही हे सत्य आहे. सत्य म्हणजे परमेश्वरच. मी सत्यरुपी परमेश्वराचाच पुजारी आहे. सत्य प्रेरणा ही महात्मा गाधींची आत्मप्रेरणा होय.
भारतीयांना इंग्रजांच्या अन्यायी अत्याचारी, जुलमी सत्तेतून रक्ताचा एकही थेंब न सांडता सत्याग्रहाच्या आणि उपोषणाच्या मार्गाने मुक्त करून जगाला एक नवा क्रांतीचा मार्ग दाखवून दिला. परकीय सत्तेला देशातून हाकलून देण्यासाठी सत्य, अहिंसा, असहकार, सत्याग्रह आणि स्वदेशीचा वापर, उपोषण आणि हरताळ, दांडीयात्रा, आमरण उपोषण, अशा विधायक मार्गाचा वापर करून हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा या थोर राष्ट्रपित्याने अस्पृश्यांना समानतेची वागणूक मिळावी म्हणून मानवतेची शिकवण देशवासीयांना दिली.
1920 साली भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर महात्मा गांधीनी पदार्पण करुन असहकारितेची चळवळ सुरू केली. गांधीजीच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानात सत्याला केंद्रीय स्थान होते. गांधीजींनी आपल्या आत्मकथेत म्हटले आहे” माझे सत्य हे स्थूल वाचिक सत्य नव्हे तर जसे वाचेचे तसेच विचारांचेही हे सत्य आहे. सत्य म्हणजे परमेश्वरच मी सत्यरुपी परमेश्वराचाच पुजारी आहे. सत्य प्रेरणा ही महात्मा गाधींची आत्मप्रेरणा होय, या मुळेच अहंकारातून, आपपर भावांतून मुक्त होऊन महात्माजी विश्वात्म्याशी एकरूप होऊ शकले. ही सत्य साधना करण्यासाठी महात्माजींनी ब्रम्हचर्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, दरिद्रता, आदि एकादश व्रते पालन करण्याचा आग्रह धरला आहे. गांधींजींवर रस्कीनच्या तत्वज्ञानाचा प्रभाव होता. रस्कीनच्या प्रभावामुळेच सर्वोदयाचे सिद्धान्त गांधीजींना जीवनात उतरविता आले. गांधीजी अन्यायाशी तडजोड करावयास कधीही तयार नसत. आपल्या मित्रांनी अन्याय केला तरीही गांधीजी त्यांच्या विरुद्ध उभे राहत. सत्याग्रह ही एक जीवनपद्धती आहे. सत्याग्रहीने अन्यायापुढे कधीही शरण जाता कामा नये. त्याने अन्यायाचा धैर्याने प्रतिकार केला पाहिजे. परंतु हा प्रतिकार अहिंसक रितीने झाला पाहिजे “”हा आग्रह धरताना गांधीजी म्हणत , मला शूरांची अहिंसा पाहिजे; भ्याडाची अहिंसा नको. भ्याडपणापेक्षा प्रसंगी मी हिंसा पत्कारीन. न्यायासाठी मरण स्वीकारण्यास ही तयार असले पाहिजे असे गांधीजी म्हणत.
स्वातंत्र्यासंबंधीचे सर्वसामान्य जनतेचे औदासीन्य आणि निष्क्रियता भारतीय क्रांतिकारकांना असह्य वाटत असे. हे औदासीन्य आणि ही निष्क्रियता नाहीशी होऊन जनतेच्या मनात परकीय राजवटीविरुद्ध त्वेष निर्माण व्हावा यासाठी निष्ठावान देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी आत्मबलिदान केले पाहिजे अशी भूमिका क्रांतिकारकांनी घेतली होती. गांधीजी आणि त्यांचे सहकारी स्वातंत्र्यासाठी आत्मसमर्पण करावयास तयार होते. परंतु केवळ मूठभर व्यक्तींच्या बलिदानामुळे स्वातंत्र्यचळवळ बलशाली होऊ शकणार नाही अशी गांधीजींची धारणा होती. मूठभर असामान्य व्यक्तींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावयाचा आणि इतरांनी त्यांच्या त्यागाची स्तुतिस्तोत्रे गात केवळ बघ्याची भूमिका घेऊन तटस्थ रहावयाचे, ही कल्पना गांधीजींना मान्य नव्हती. या बद्दल केवळ तात्विक भूमिका पत्करून ते स्वस्थ बसले नाहीत. प्रत्येक भारतीयाने स्वातंत्र्य लढ्यात स्वत:चा वाटा उचलला पाहिजे. असे मोघमपणे न सांगता कोणत्या रितीने सर्वांना स्वातंत्र्य संग्रमात सहभागी करून द्यावयाचे याची एक योजना मनाशी पक्की करून गांधीजींनी तो कार्यक्रम देशापुढे ठेवला यालाच ते विधायक कार्यक्रम म्हणत.
“यंग इंडिया’या वृत्तपत्रातून गांधीजी आपल्या कल्पना देशासमोर मांडत असत. 21 मे 1925 च्या “यंग इंडिया’मध्ये त्यांनी लिहिले आहे. “”स्वराज्याच्या यात्रेची वाटचाल खडतर आहे. या मार्गाने जाताना खेड्यांची सेवा करण्याच्या हेतूने खेड्यांपर्यंत जाऊन पोहोचावे लागेल वेगळ्या शब्दात सांगायचे तर, देशातील आम जनतेचे शिक्षण करायचे आहे. लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करावयाची आहे, वाढवायांची आहे. एकदा जादूगार जसे क्षणार्धात आंब्याचे झाड उभे करतो. तसे हे झटपटपणे करता येणार नाही वटवृक्ष कसा आणि केंव्हा वाढतो ते कळत नाही. कोणाला काही दिसत नाही. त्याच प्रमाणे समोर फारसे काही न दिसता राष्ट्राभिमानाचा हा वृक्ष सावकाश वाढत जाईल विधायक कार्यक्रमांतून जनमानसात स्वातंत्र्यभावना रुजविण्याची गांधींजींची कल्पना उदात्त आणि भव्य होती. असमान्य कर्तृत्व असलेले प्रगल्भ वृत्तीचे अनेक कार्यकर्ते गांधीजींच्या विधायक कार्यक्रमाच्या या कल्पनेने भारले होते.
स्वातंत्र्य हे आपले उद्दिष्ट आहे याचा विसर गांधीजींना कधीही पडला नाही गांधीजींना लोकमानस बरोबर समजत असे. या कोट्यवधी जनतेला जागृत करून स्वातंत्र्य लढ्यात समील करुन घेण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे याचा शोध ते अहारात्र घेत होते. या देशातील लोकांच्या अंतरंगाची ओळख पटण्यासाठी काय केले पाहिजे, या संबधीचा जो सल्ला गांधीजींना त्यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले यांनी दिला होता. त्याचा गांधीजींना कधीही विसर पडला नाही. दक्षिण आफ्रिकेतून गांधीजी परत आल्यावर गोखल्यांनी त्यांना राजकीय कार्य सुरू करण्याआधी संपूर्ण भारतभर फिरून येण्यास सांगितले आणि सल्ला दिला, फिरताना डोळे आणि कान उघडे ठेव, तोंड मात्र बंद ठेव’ 1920 ची देशव्यापी चळवळ सुरू करण्यापूर्वी गांधीजींनी गोखल्यांच्या या आज्ञेचे तंतोतंत पालन करून देशाच्या सामाजिक आर्थिक आणि मानसिक परिस्थितीचे निरीक्षण केले. लोकांच्या आर्थिक विपन्नावस्थेचे त्यांना विदारक दर्शन झाले. गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी समान्यातल्या सामान्यांचा सहभाग जसा मिळवला तसाच समाजातल्या श्रीमंत वर्गातील सुशिक्षितांच्या निष्ठाही मिळवल्या. ज्ञान आणि संपत्ती यांना धर्मनीतीचे अधिष्ठान नसेल तर ती माणसाचा अध:पात करते असे गांधीजी सांगत. गांधीजींनी खरा धर्म जगाला दाखवला. त्या धर्मासाठी ते शहीद झाले. प्रेम, त्याग, दया, अहिंसा आणि आत्मबलिदान हे सत्याकडे जाण्याचे मार्ग असून खऱ्या सत्याग्रहीने या मार्गाने वाटचाल केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. असहकार, सविनय कायदेभंग, उपोषण, हिजरत, हरताळ आणि बहिष्कार हे सत्याग्रहाचे प्रमुख प्रकार वा आविष्कार होत.
इ.स. 1920 ते 1947 पर्यंत भारताचा स्वातंत्र्य लढा गांधींजींच्या नेतृत्वाखालीच लढविण्यात आला. या कालखंडाचे वर्णन मूलत: “गांधीयुग’ असेच केले जाते या प्रदिर्घ काळात गांधीजींनी 1920 ची असहकार चळवळ, 1930ची सविनय कायदेभंगाची चळवळ आणि 1942 ची “चलेजाव’ची चळवळ असे तीन मोठे लढे ब्रिटिश राज्यकर्त्यांविरुद्ध लढविले. गांधीजी हे राष्ट्रीय ऐक्याचे आणि चळवळीचे प्रतीक बूनन राहिले होते. त्यांच्या शब्दानुसार हजारो लाखो देशभक्त देशाकरिता आपल्या प्राणाची आहुती देण्यास सिद्ध झाले होते. त्यांनी भारतीय जनतेला नि:शस्त्र प्रतिकाराचा नवा मंत्र शिकविला. या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सिहांचा वाटा होता. त्यातूनच 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्याची पहाट उगवली. आपल्यासाठी आपल्या मागे गांधीजींनी सत्य भक्ती आणि प्रार्थना यांचा प्रकाश ठेवला आहे. ते स्वत: प्रार्थनेशिवाय एक दिवसही राहू शकत नसत. मूक प्रार्थना ही माझी सर्वात मोठी शक्ती आहे असे ते म्हणत. जेव्हा-तेव्हा आपण “रघुपती राघव राजाराम! पतीत पावन सीताराम ही प्रार्थना ऐकतो तेंव्हा तेव्हा गांधीजींची स्मृती जागी होते. त्या स्मृतीपाठोपाठ त्यांचा आत्मा अदृष्यपणे उपस्थित होऊन आपल्याला आशीर्वाद देतो.
मोहन एस. मते