अकोला : महाराष्ट्रात करोना संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. मात्र लॉकडाऊननंतर राज्यातील करोना स्थिती काही प्रमाणात आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपण आणि फडणवीसांनी इतर सर्व नेत्यांच्या तुलनेत करोना काळात सर्वाधिक काम केल्याचा दावा केला होता. आता फडणवीसांनी केलेल्या दाव्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिल्याने महाराष्ट्राला सर्वाधिक मदत मिळाली आहे.
महाराष्ट्राला आवश्यक असलेली मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मी नेहमीच मागत असतो. त्यामुळे पंतप्रधानांनी राज्याला सर्वाधिक रेमडेसिविर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा पुरवठा केला. मात्र त्याचा योग्य वापर करून घेण्यात राज्य शासन अपयशी ठरले, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. अकोला जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते रविवारी येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांना मी नेहमीच पत्र लिहित असतो. त्यांच्याकडे वारंवार मागणी केल्यानेच राज्याला रेमडेसिविर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सर्वाधिक मदत मिळाली. इतर सुविधाही राज्याला केंद्राकडून मिळाल्या. मात्र अनेक ठिकाणी चार-चार महिन्यांपासून व्हेंटिलेटरचा वापर झाला नाही. वापराअभावी ते खराब होत आहेत. केंद्र शासनाने दिलेल्या यंत्राचा ताबडतोब वापर करणे आवश्यक होते. मात्र, राज्य सरकारने हलगर्जीपणा केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
यावेळी फडणवीसांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देखील टोला लगावला. फडणवीसांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. त्यावरून नाना पटोले यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर फडणवीस म्हणाले की, काही नेत्यांना नुसती टीका करण्याची सवय असते, अशांना मी उत्तर देत नसतो.