नवी दिल्ली – गेल्या आठवड्यात सरकारने जानेवारी महिन्यातील किरकोळ महागाई कमी झाल्याची आकडेवारी जाहीर केली होती. मात्र घाऊक महागाईत वाढ झालेली आकडेवारी आज सरकारने सादर केली. त्यामुळे महागाईच्या आघाडीवर रिझर्व बॅंक व सरकारला आगामी काळात लक्ष द्यावे लागणार आहे. जानेवारी महिन्यातील 2.03 टक्के इतकी मोजली गेली आहे.
डिसेंबर महिन्यात घाऊक किमतीवरील महागाई केवळ 1.22 टक्के होती. तर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये घाऊक महागाईचा दर 3.52 टक्के होता. जानेवारी महिन्यामध्ये अन्नधान्य आणि फळांचे दर कमी झाले असले तरी उत्पादित वस्तू, इंधन, वीज, पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू इत्यादीच्या किमती वाढल्या आहेत.
त्यामुळे त्याचा एकूण महागाईच्या दरावर परिणाम झाला असल्याचे दिसून येते. महागाईचा दर वाढत असल्याबद्दल ईक्राच्या अर्थतज्ञ आदिती नायर यांनी सांगितले की, महागाई जास्त वाढली असती मात्र अन्नधान्याचे दर कमी झाल्यामुळे मोठा परिणाम जाणवला नाही. आगामी काळामध्ये विविध वस्तूंची मागणी वाढणार आहे. त्याचबरोबर बाजारात भांडवल सुलभता आहे. त्यामुळे महागाई वाढत जाऊन ते साडेपाच टक्क्यांपर्यंत जाईल असे त्यांनी सांगितले.
महगाई वाढण्याची शक्यता गृहीत धरूनच रिझर्व बॅंकेने गेल्या दोन पत धोरणांमध्ये व्याजदर जैसे तेथे ठेवले आहेत. रिझर्व बॅंक पतधोरण तयार करताना किरकोळ महागाईचा दर विचारात घेते. गेल्या आठवड्यामध्ये जानेवारी महिन्यातील किरकोळ महागाईचा दर काही प्रमाणात कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे.
मात्र घाऊक महागाई वाढत असल्यामुळे आगामी काळात किरकोळ दरावरील महागाई वाढत जाण्याची शक्यता तज्ञाकडून व्यक्त करण्यात येत आहे. रिझर्व बॅंकेने व्याजदर जैसे थे ठेवले असले तरी केंद्र सरकारने इंधनाचे दर वाढते ठेवल्यामुळे इंधनाचे दर विक्रमी पातळीवर गेले आहेत.
डिझेलचा दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वच वस्तूंचे दर त्या प्रमाणात वाढू शकतात. यासाठी डिझेलचे दर कमी करण्याची मागणी वाहतूकदारांच्या संघटनेने अगोदरच केली आहे. मात्र लॉक डाऊनच्या काळात निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार काही प्रमाणात इंधनाचे दर उच्च पातळीवर कायम ठेवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.