न्यूयॉर्क – सर्वसाधारण नागरिक आपली रोजीरोटी कमावण्यासाठी ज्या कामाच्या ठिकाणी दररोज येत असतात त्या ठिकाणी असणारे हवा प्रदूषण किंवा तेथील गोंधळ आणि कामाचे जास्त तास हे अतिशय घातक ठरत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात समोर आले आहे.
कामाच्या ठिकाणची परिस्थिती अनुकूल व्यवस्थित आणि योग्य नसल्याने 2016 या एका वर्षामध्ये वीस लाख लोकांपेक्षा जास्त कामगारांचा बळी गेल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात दिली आहे.
आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या सहकार्याने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यामध्ये कामगारांना कामाच्या ठिकाणी कोणत्या विविध समस्यांशी आणि प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागतो याची माहिती देण्यात आली आहे.
त्यामध्ये सर्वात मोठे कारण हवा प्रदूषणाचे देण्यात आले आहे. ज्या ठिकाणी हवा प्रदूषण असेल आणि मोठ्या प्रमाणात गोंधळ असेल किंवा कामाचे तास जर नेहमी पेक्षा जास्त असतील तर त्याचा मानसिक आणि शारीरिक परिणाम कामगारांवर होतो आणि अंतिमतः अनेकांना आपला जीव गमवावा लागतो असे या अहवालात म्हटले आहे.
आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने 2000 ते 2016 या कालावधीत केलेल्या अभ्यासावर आधारित हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. अहवालात दिलेल्या माहितीप्रमाणे सुमारे साडेसात लाख कामगारांचा मृत्यू हवा प्रदूषणामुळे झाला असून साडेचार लाख पेक्षा जास्त कामगारांचा मृत्यू हा कामाच्या जास्त तासांमुळे झाला आहे.
नोकरीच्या कालावधीमध्ये कोणत्याही कारणाने झालेली जखम किंवा अपघात हे कामगारांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी महत्त्वाचा हातभार लावतात असेही या अहवालात म्हटले आहे.