राजेंद्र भुजबळ
शिर्डी – कायदा सर्वांना सारखाच असताना शिर्डीत मात्र अवैध व्यावसायिकांना पोलिसांचे अभय का ? असा सवाल उपस्थित होत आहे. शिर्डी सारखे पवित्र तीर्थस्थान अवैध व्यवसायाने जर बदनाम होत असेल तर त्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाचीच जबाबदारी आहे. मात्र, त्यांच्या दुर्लक्षामुळे पुन्हा काही अपप्रवृत्तींचा उगम होत असेल तर तो शिर्डी शहरासाठी घातक ठरू शकतो. हा गंभीर प्रकार थांबविण्यासाठी तसेच त्यावर कायमचाच पायबंद करण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत.
शिर्डीत देश-विदेशातून सरासरी 50 हजारांहून अधिक भाविक साईंच्या दर्शनासाठी येतात. आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेल्या या तीर्थस्थानी भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी तसेच शिर्डी शहरात कायदा, सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा आहे. पंधरा दिवसांपूर्वी राज्याचे महसूलमंत्री यांनी शिर्डीत वाढलेल्या गुन्हेगारीसंदर्भात सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत शिर्डीत पॉलिशवाल्यांकडून हार प्रसादाच्या नावाखाली होणारी भाविकांची लूट, फसवणूक, अतिक्रमण, अवैध धंदे याचा पाढाच ग्रामस्थांनी वाचून दाखविला.हे ऐकल्यानंतर स्वतः विखे पाटील सुद्धा अचंबित झाले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना विशेष सूचना करून कारवाईची मोहीम राबविण्याच्या सूचना विखे पाटील यांनी केल्या.
दुसऱ्याच दिवसापासून हार, प्रसाद विक्री करणारे, एजंट, पॉलिशवाले, फूटपाथवर हातावर व्यवसाय करणारे व्यावसायिक, नशेबहाद्दर यांच्यावर अतिरिक्त पोलीस यांच्यासह शिर्डी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी कारवाईचा बडगा उगारला. याच कारवाई दरम्यान शेकडो नागरिकांवर कारवाई झाली तर कारवाईचा धसका घेत हजारो अनोळखी नागरिकांनी शिर्डी सोडणे पसंद केले. कारवाईचा आजचा 22 दिवस आहे मात्र या 22 दिवसांत शिर्डीत सर्व ठिकाणी शांतता, स्वच्छता आणि विशेष म्हणजे कुठेही अतिक्रमण नाही. त्यामुळे भाविकही बिनधास्त बाजारपेठेत फिरताना बघून अनेकांनी पोलिसांच्या कारवाईला धन्यवाद दिले तर भाविकांची फसवणूक किंवात्यांना बळजबरीने हार प्रसाद तसेच पूजेचे साहित्य देण्याची एकही घटना घडली नाही. या करवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी केलेल्या धाडसी कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे .
हे शिर्डीच्या इतिहासात प्रथमच घडले असून या मोहिमेमध्ये मिळालेल्या यशानंतर पोलिसांची नजर आता अवैध प्रवासी वाहनाकडे पडली आहे. वाहतूक शाखा पोलिसांनी शेकडो अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंडही वसूल केला. याकामी शिर्डी पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील आणि त्यांच्या टीमची मेहनतीचे शिर्डी ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
हे सर्व होत असताना शिर्डीत दोन मटका किंग यांनी आपले उभारलेले जाळे आणि नेमलेले पंटर यांची अचानक एन्ट्री झाली. अनेक उपनगरात त्यांच्यामार्फत कल्याण मटका जुगाराचा व्यवसाय तेजीत सुरू झाला आहे. कोपरगावच्या एका मोठ्या व्यक्तीने बेकायदेशीर ऑन लाईन लॉटरीचा व्यवसाय शिर्डीत पुन्हा जोमाने थाटला आहे.
एका हॉटेलवर पत्त्याच्या जुगाराचा क्लबला सुद्धा पोलिसांचे आशीर्वाद प्राप्त झाल्याने त्यांचाही व्यवसाय तेजीत सुरू झाला आहे. दारूची गल्ली बोळातील दुकानेही सुरू आहे. त्यामुळे कधी रस्त्यावर अनेक तळीराम झिंगून पडलेले दिसतात. हे वास्तव आजही शिर्डीत सर्वजण उघड्या डोळ्याने बघत आहे पण खरंच शिर्डी पोलीस कारवाई करत आहेत की पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिखाव्यासाठी हे करत आहे का ? असा सवाल शिर्डी ग्रामस्थ करत आहे. कारण एवढा पोलीस फौजफाटा उपलब्ध असताना केवळ गोरगरीब जनतेवर कारवाई करून स्वतःची पाठ थोपटून घेत असेल तर अवैध धंद्यावाल्यांना सूट का ? की त्यात काही अर्थकारण दडलं आहे की कुणा प्रतिष्ठित व्यक्तींचे पाठबळ आहे याच प्रश्नाने आता डोकं वर काढल आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या गंभीर बाबींची तक्रार शिर्डी ग्रामस्थ करणार आहेत.
शिर्डीत कायदा सुव्यवस्था कायमच अबाधित असावी आणि कुठलेही अवैध व्यवसाय खपवून घेणार नाही, अशा कडक सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या असून शिर्डी पोलिसांनी त्याचे गावाच्या हितासाठी काटेकोर पालन करणे अपेक्षित आहे.
– कैलासबापू कोते, प्रथम नगराध्यक्ष शिर्डी