श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात विविध मानाच्या परंपरा आहेत. सोहळ्यादरम्यान कधी, कुठे, कोणी आणि काय सेवा करायची याबाबत परंपरेने नियम घालून दिलेले आहेत. भजन, कीर्तनाच्या सेवेपासून ते रथाच्या बैलजोडीच्या सेवेबद्दल परंपरेचे नियम आहेत. त्यानुसार अनेक वर्षांपासून माऊलींच्या पालखी रथाच्या बैलजोडीची मानाची सेवा ही आळंदी ग्रामस्थांच्याकडे देण्यात आली आहे.
दरवर्षी पालखी सोहळ्याला बैलजोडी ही आळंदीकर ग्रामस्थांपैकीच असते. हे कुटुंबीय माऊलींच्या या सेवेची वाट पाहून असतात. “ही सेवा मिळणे म्हणजे आमचे भाग्य आहे. या बैलांची सेवा करताना प्रत्यक्षात माऊलींची सेवा केल्याचे समाधान मिळते,’ अशी भावना मानकरी कुटुंबीय व्यक्त करतात.
सहा आडनावाच्या कुटुंबीयांना मान
पालखी सोहळ्याच्या बैलजोडीच्या सेवेचा मान हा आळंदीकर ग्रामस्थांना दिला आहे. गावातील सहा आडनावाच्या कुटुंबीयांना हा मान देण्यात आला आहे. यात कुऱ्हाडे, घुंडरे, वाहिले, भोसले, रानवडे, वरखडे या आडनावांच्या कुटुंबीयांना हा मान आहे. दर सहा वर्षांनी फिरून पुन्हा त्या कुटुंबीयांकडे सेवा येते. मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने हे कुटुंबीय माऊलींच्या पालखीसाठी लागणाऱ्या बैलजोडीची सेवा करतात. यंदा हा मान भोसले कुटुंबीयांकडे आहे.
अशी केली जाते निवड
बैलजोडीची निवड करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा बैलजोडी निवड समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सात जणांची ही समिती आहे. पालखी प्रस्थान सोहळ्याच्या दोन महिने आधी समितीची बैठक होते त्यामध्ये या वर्षीची सेवा कोणाची आहे, हे पाहून संबंधित कुटुंबीयांना सूचित करण्यात येते. त्यानंतर देवस्थानकडे अर्ज करून निवड केली जाते. बैलजोडी कशी असावी, याबद्दल काही निकष आहेत ते तपासून बैलजोडीची निवड केली जाते.
भव्य मिरवणूक
निवड झालेल्या बैलजोडीचे औक्षण करून पूजन केले जाते. त्यानंतर वाद्यांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करून विविध ठिकाणी मानाच्या बैलजोडीचे औक्षण आणि पूजन करून मिरवणुकीचा समारोप करण्यात येतो. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने बैलजोडीचे वेदमंत्रांच्या उच्चारात विधिवत पूजन करण्यात येते. ही परंपरा अखंड कायम आहे.
बैलजोडीची निवड करताना सर्व निकष तपासले जातात. बैलजोडी ही पांढऱ्या शुभ्र रंगाची आणि देखणी हवी असते. सात जणांच्या समितीने सर्वानुमते निर्णय घेऊनच निवड केली जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात माऊलींच्या पालखी रथाला जुंपण्यासाठी फलटणच्या राणीची बैलजोडी आणली होती; तेव्हा आळंदीकरांनी याला विरोध केला. त्यावेळी कोर्टाने ग्रामस्थांची समिती स्थापन करून त्यांच्याकडे पालखी रथाला बैलजोडी पुरवण्याची जबाबदारी दिली. तेव्हापासून दरवर्षी माउलींच्या रथाला आळंदीकरांची बैलजोडी असते, असे श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ बैलजोडी निवड समितीचे बबनराव कुऱ्हाडे म्हणाले.