पुणे – महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी दिवाळीच्या ऑक्टोबरच्या अखेरपासून संप पुकारला आहे. राज्यातील काही आगारांमध्ये संप अद्यापही सुरू असून, संचलन ठप्प आहे.
तर सोमवारपासून (8 नोव्हेंबर) हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे आंतरजिल्हा प्रवासाबाबत नागरिकांच्या मनात धास्ती कायम आहे. त्यामुळे प्रवाशांनी इच्छित ठिकाणे गाठण्यास सुरूवात केली आहे. तर काहींनी तिकीटे रद्द केली आहेत.
एसटी महामंडळाचे शासन सेवेत विलिनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसह महागाई भत्ता, वेतनवाढ आदी मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. त्यामुळे कर्मचारी हजर न झाल्याने ऐन दिवाळी एसटीच्या विविध मार्गांवरील फेऱ्या रद्द झाल्या होत्या. एसटी प्रशासनाने आर्थिक मागण्यांबाबत दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील काही आगारांमध्ये कामकाज आठवडाभरात सुरू झाले.
तर काही आगारांमध्ये अद्यापही संप सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास संप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. परिणामी विविध राज्यभर आगारांमधील कर्मचारी संपात सहभागी होणार आहे. एसटीच्या पुणे विभागातील वाहतूक बंद राहणार असल्याचे संकेत संघटनांकडून देण्यात येत आहेत.
संपाबाबत रविवारी पुण्यात राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. कर्मचाऱ्यांकडून होणारी विलिनीकरणाची मागणी योग्यच आहे. याला या बैठकीत पाठिंबादेखील देण्यात आला.
8 नोव्हेंबर रोजी सकाळी उच्च न्यायालयाची सुनावणी देखील आहे. तर मुंबईत कृती समितीची बैठक देखील होणार आहे. त्यावेळी चर्चा करुन संपाचा निर्णय घेण्यात येणार आहे.
– संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार
संघटना आणि आयोजक, कृती समिती
रविवारी पुणे जिल्ह्यातील इंदापूर, राजगुरूनगर आणि नारायणगाव या आगारांतील संचलनावर परिणाम झाला होता. संपात सहभागी होणार असल्याचे पुणे विभागातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयाला पत्र दिले आहे.
– रमाकांत गायकवाड,
विभाग नियंत्रक, पुणे विभाग
माझे पुणे ते बीडचे तिकीट होते. बीडकडे जाताना बसेस आहेत. परंतु, परतीच्या प्रवासात बसेस उपलब्ध होण्याबाबत अनिश्चितता वाटते. यामुळे तिकीट रद्द करावे लागले. परिणामी “कॅन्सलेशन चार्जेस’चा भुर्दंड सहन करावा लागला.
– ज्योत्स्ना पांडे, प्रवासी
दिवाळीपूर्वी कुटुंबीय लातूरला नातेवाईकांकडे गेले आहेत. पण, संपामुळे त्यांना पुण्यात परतता आले नाही. खासगी ट्रॅव्हल्स नियमित प्रवास भाड्यापेक्षा दुप्पट दर आकारत आहेत. त्यामुळे कुटुंबीयांना लातूरमध्येच थांबावे लागले आहे.
– अनिकेत गरुड, पुणे