केंदूर – करंदी (ता. शिरूर) येथील मारुती मठ ते मुखई रोड या रस्त्याचे काम सुरू आहे; मात्र कंत्राटदार या कामात हलगर्जीपणा करत असल्याची बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक होत सुरु असलेले काम बंद पाडले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून करंदी येथील मुखई रस्त्याचे काम सुरु आहे; मात्र हे निकृष्ट दर्जाचे होत आहे, अशी तक्रार अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार करूनही अधिकारी काणाडोळा करीत आहेत. साइडपट्ट्यावर मुरूम भरण्याऐवजी रस्त्याच्या बाजूची माती उकरून तीच माती त्याचबरोबर मातीचा चिखल साइडपट्ट्यावर टाकून काम सुरू आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींकडे जाणूनबुजून कंत्राटदार काणाडोळा करत रस्त्याचे काम सुरूच ठेवत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आणि निकृष्ट दर्जाचे सुरू असलेले काम बंद पाडले आहे.
जोपर्यंत कंत्राटदार, सामाजिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये बैठक होत नाही, तोपर्यंत काम करू देणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान कंत्राटदार बाळासाहेब सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता काम चांगल्या दर्जाचे आहे ग्रामस्थांचे गैरसमज होत आहे. याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाशी समन्वय साधला आहे.
दरम्यान येत्या दोन दिवसांत ग्रामस्थ, अधिकारी व कंत्राटदार यांची बैठक होणार आहे त्यानंतरच काम सुरु होईल, असा ग्रामस्थांनी पवित्रा घेतल्याने काम बंद पाडले आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाप्पू दरेकर, वैभव ढोकले, लहू दरेकर, नवनाथ कदम, योगेश ढोकले, जावेद इनामदार, अक्षय ढोकले, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. येत्या दोन दिवसांत कंत्राटदार आणि ग्रामस्थांचा समन्वय साधण्यासाठी बैठक घेऊ, काम चांगल्या दर्जाचे करण्यासाठी सूचना केल्या आहेत.
– बी. एल. चौरे, शाखा अभियंता, बांधकाम विभाग