पुसेगाव, (प्रतिनिधी) – वर्धनगड, ता. खटाव येथे वनक्षेत्रात रविवारी (दि. 24) रात्री 2 वाजता वणवा लागला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पाटील गणेश जठार यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन नंबरवरून ही माहिती संपूर्ण गावाला तात्काळ कळवली. त्यानंतर ग्रामस्थ आणि वन विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांनी तेथे धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
पोलीस पाटील जठार यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून माहिती दिल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी चांगदेव जाधव यांनी मंदिराच्या ध्वनिक्षेपकावरून वारंवार आवाहन केल्यानंतर माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते अर्जुन कुंभार, सादिक शिकलगार आणि काही तरुण मदतीसाठी धावले. वनाधिकारी तांबोळी व त्यांचे सहकारी अर्ध्या तासात वर्धनगड येथे पोहोचले. ग्रामस्थ आणि वन विभागाच्या कर्मचार्यांनी दोन तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली.
ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या वापरामुळे मोठा अनर्थ टळला. या डोंगरावर आठवडाभरात दोन वेळा आग लागली. ही आग लागत आहे की, लावली जात आहे, याचा शोध वन विभागाने घ्यावा, अशी मागणी होत आहे. सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून, वणवे लावल्याने वनसंपदा धोक्यात येत आहेत.
या डोंगरावरील जंगलात वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. डोंगराच्या पायथ्यालगत तलाव असल्याने वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी तलावावर येतात. मात्र, वणव्यांमुळे वन्यप्राण्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. याबाबत वन विभागाने ठोस पावले उचलावीत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.