पुणे, दि. 8 – “शिवसेना ही आताच पहिल्यांदा फुटली का? शिवसेनेतून भुजबळांना, गणेश नाईक, नारायण राणे यांना कोणी बाहेर काढले? महाराष्ट्रात आमदार फोडण्याची, खरेदी करण्याची संस्कृती कोणी सुरू केली? असा प्रश्न विचारून त्यावेळी “खोका’ नव्हता तर “पेटी’ शब्द होता. त्यावेळी त्यांना “पेट्या’ दिल्या असतील, असा आरोप उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केला. सध्याच्या झालेल्या सत्तापरिवर्तनात मात्र तसे झाले नाही. पक्षात राहून घुसमट झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली,’ असे पाटील म्हणाले.
“हर हर महादेव’ या चित्रपटाला होणाऱ्या विरोधाबाबत बोलताना पाटील म्हणाले की, याविषयी तपशीलवार माहिती आपल्याला नाही. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा टेंभा मिरवणाऱ्यांनी दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे कारण नाही. त्यासाठी कायदाही हातात घ्यायची आणि “हम करे सो कायदा’ असेही म्हणण्याची गरज नाही.
शिंदे यांना फडणवीस मदत करतील
सक्षम नेतृत्त्व कसे असले पाहिजे हे फडणवीस यांच्या रुपाने आम्ही पाहिले आहे. विरोधी पक्षनेता कसा असला पाहिजे, प्रशासन आणि पक्ष असे एकूणच कसे चालवले पाहिजे हे फडणवीसांचे उदाहरण पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासले पाहिजे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या` पक्षात काही प्रश्न निर्माण झाला तर तो सोडवला पाहिजे. फडणवीस हे मित्रत्त्वाच्या नात्याने त्यात मदत करतील; परंतु ती मदत कोणाला न दिसता केली पाहिजे जे ते करतात, असे पाटील यांनी नमूद केले.
दरम्यान, राज्यातील बदलत्या राजकीय संस्कृतीबद्दलही पाटील यांनी भाष्य करत ती सुधारण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मतही पाटील यांनी व्यक्त केले.
“समझने वालोंको इशारा काफीं है…’
जुन्या काळात काय झाले हे आता मला सांगायचे नाही, तसे केले तर मी अब्दुल सत्तारांचे समर्थन केले असे होईल. परंतु मी एका मोठ्या नेत्याची जुनी क्लिप पाहिली. तो कोण नेता आहे, कोणत्या स्तरावरचा आहे तो एका महिलेला काय म्हणतो आहे हे पाहिल्यास त्यांची संस्कृती समजेल, असे पाटील म्हणाले. तसेच शिवसेना फोडणारे नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत का, असे विचारले असता, “समझने वालोंको इशारा काफीं है. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात टोप्या फेकण्याचे काम केले आहे., ज्याच्या डोक्यावर बसेल ते बसेल.’ असे पाटील म्हणाले.