नगर -गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता क्लीनचिट मिळवून सेवेत पुन्हा रुजू झाल्यानंतरही वाधवान बंधूंचा बागवान कोण? हे अखेरपर्यंत राज्यातील जनतेला समजलेच नाही, अशी खोचकी टीका माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
राज्यात लॉकडाऊनचा कालावधी जाहीर असतानाही वाधवान बंधूंना लोणावळा ते महाबळेश्वर, असा पास गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना दिला होता. यावरुन राज्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती.राज्य सरकारही टीकेचे धनी ठरले. जनतेचा रोष लक्षात घेता अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. मात्र आता पुन्हा सरकारनेच त्यांना क्लीनचिट देवून सेवेत हजर करुन घेतले. त्यावर आ. विखे पाटील म्हणाले, प्रशासनातील एक उच्चपदस्थ अधिकारी अशा पद्धतीने पास देण्याचे धाडस कोणाचा आशीर्वाद असल्याशिवाय करू शकणार नाही.
ही बाब त्यांनी प्रामुख्याने माध्यमांच्या निदर्शनास आणून दिली. अमिताभ गुप्ता यांनी स्वत:च्या अधिकारात वाधवान बंधूंना दिलेल्या पत्राची बाब उघड झाल्यानंतर या प्रकरणाची ताबडतोब सीबीआय चौकशी करा, ही मागणी केली होती. वाधवान बंधूंचा बागवान कोण? या संपूर्ण प्रकरणामागील बोलविता धनी कोण? हे राज्याला समजले पाहिजे, ही आपली भूमिका होती. पण राज्य सरकारने सीबीआय चौकशीची घोषणा करुन राज्यातील जनतेची दिशाभूल केली, हेच आता उघड झाले आहे.