प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 – पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता दरवर्षी दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होते. दरवर्षी मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून मानाच्या गणपतींची आरती करूनच या मिरवणुकांची सुरूवात होते. मात्र, यंदा मंडई येथे मेट्रो स्टेशनच्या कामासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीची जागा बदलली जाण्याची शक्यता आहे. महापालिकेकडून त्यासाठी चाचपणी सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
पुण्याचा गणेशोत्सवाची मोठी पर्वणी म्हणजे ढोल, ताशांच्या गजरात आणि रांगोळ्यांच्या पायघाड्यात निघणारी विसर्जन मिरवणूक असते. या मिरवणुकीची सुरुवात मानाच्या गणपतींची आरती करून मंडई येथून केली जाते. दरवर्षी महापौरांच्या हस्ते आरती केली जाते. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदारही उपस्थित असतात. मंडईच्यासमोरून ही मिरवणूक काढली जाते. मात्र, या मिरवणुकीसाठी जिथे मांडव घातला जातो तेथे यंदा मेट्रोचे काम सुरू आहे. तर पुढील बाजूस बाबू गेनू मंडळाचा मांडव असतो. त्यातच दोन वर्षांनंतर यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात होणार असल्याने मिरवणूक रथ तसेच गर्दीसाठी रस्ता अपुरा पडणार आहे. परिणामी, महापालिका प्रशासनाचीही कोंडी झाली असून मिरवणूक पारंपरिक जागेपासून सुरू करायची, की ती थोडे पुढे जाऊन करायची? याबाबत निर्णय घेतला जात आहे.
मंडई येथे जिथे पारंपरिक जागेपासून मिरवणुकीची सुरुवात होते, तिथे वेगळे नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू असून, लवकरच निर्णय घेतला जाईल.
– विक्रम कुमार, मनपा आयुक्त