पुणे, दि. 26 -शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर पीएमपी प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. नियोजन करूनही वेळेत बस मिळत नसल्याची कैफियत मांडली जात आहे. या मार्गावर “पुण्यदशम’ बस सुरू असल्या, तरी त्यांची क्षमता कमी आहे. त्या स्वारगेटलाच पूर्ण भरत असल्यानेच पुढील थांब्यांवरील प्रवाशांचे हाल होत आहेत.
बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमपीने मोठ्या दहा बसचे मार्ग बदलले आहेत. यामुळे बाजीराव रस्ता परिसरात जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्यानंतर पीएमपी या मार्गावर “पुण्यदशम’ बस वाढविल्या, तरी प्रवाशांना थांब्यावर अर्धा-आर्धा तास बसची वाट पाहत थांबावे लागत होते. पुण्यदशमच बस लहान असल्यामुळे त्यामध्ये गर्दी होऊन प्रवाशांनाचे हाल होत होते. त्यानंतर पीएमपी कमी केलेले चार मार्ग पुन्हा बाजीराव रस्त्यावरून सुरू केले होते. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला.
वाहतूक कोंडी “जैसे थे’
बाजीराव रस्त्यावर सध्या “पुण्यदशम’च्या 24 बस सुरू आहेत. तसेच, मार्केटयार्ड ते पिंपळे गुरव, कात्रज गुजरवाडी ते चिंचवडगाव, कात्रज गुजरवाडी ते चिंचवडगाव आणि मार्केटयार्ड ते कासारवाडी रेल्वे स्टेशन या बसच्या 30 फेऱ्या सुरू आहेत. या बस ठाराविक वेळेतच येत असल्यामुळे प्रवाशांपुढे फक्त “पुण्यदशम’चाच पर्याय आहे. सहा मार्गांवरील बस बंद झाल्यामुळे वाहतूक कोंडीत काहीही फरक पडलेला नाही, असे प्रवाशांनी सांगितले. तसेच हे मार्ग पुन्हा सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.
“प्रभात’ प्रतिनिधीने नोंदवलेली निरीक्षणे
ठिकाण : बाजीराव रस्ता. वेळ : दि. 26 सप्टेंबर, सायं. 4.00
प्रत्येक थांब्यावर 15 ते 20 प्रवासी थांबलेले दिसले.
“पुण्यदशम’ बस दोन मिनिटांत येत नव्हत्या.
पाच ते सात मिनिटांनी एकामागे एक दोन ते तीन बस आल्या.
सर्व बस प्रवाशांनी भरल्या होत्या. त्यात
नव्या प्रवाशांसाठी जागाच नव्हती.
महाराणा प्रताप उद्यानासमोरील बस थांब्यावरही अशीच स्थिती होती.