Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पीएचडीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?’ असे विधान अजित पवार यांनी केले होते. यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. तसेच काहींनी अजित पवारांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. यावर भाष्य करत अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिलगिरी व्यक्त केली.
अजित पवार म्हणाले, पीएचडीबाबत माझा तोंडतून शब्द गेला काय दिवा लावला जाणार आहे. त्याचा गाजावाजा करण्यात आला, त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त केली आहे. काही संशोधक नेत्यांवर पीएचडी करत आहेत, असे होऊ नये. पीएचडी करताना विषयाचे गांभीर्य असायला हवे, पीएचडी करण्याबाबत विषय निवडीबाबत समिती नेमायला हवी. अनेक जण विविध विषयात पीएचडी करतात. जर्मन भाषेत पीएचडी केली तर अधिक फायदा होईल.”
काय म्हणाले होते अजित पवार?
सारथीसारख्या संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील यावर विधान परिषदेत चर्चा झाली. यावेळी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील विधान परिषदेत म्हणाले, “सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. परंतु केवळ २०० विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाईल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. ही संख्या वाढवण्यात यावी. सतेज पाटील यांची मागणी ऐकताच उपमुख्यमंत्री अजित पवार “पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?” असे विधान केले होते.
यावेळी अजित पवार यांनी जुन्या पेन्शनबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. जुन्या पेन्शन संदर्भात काल बैठक झाली. बैठकीला विविध संघटनेचे नेते होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत पेन्शनसंदर्भात योग्य निर्णय घेऊ. मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शनबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. सहाय समितीचा अहवाल आला असून अहवालाचे सरकारने वाचन केलेले नाही. त्यानंतर अहवाल पटलावर ठेवण्यात येईल, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच त्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असे आवाहनही संपकऱ्यांना केले आहे.
अमित शाह यांची घेणार भेट
राज्यात निर्माण झालेला कांदा प्रश्न, इथेनॉल प्रश्न आणि दूध दराचा प्रश्नाबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. अमित शाह यांची आम्ही वेळ मागितल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते. त्यानुसार अमित शाह यांनी आम्हाला वेळ दिली आहे. शुक्रवारी म्हणजे 15 डिसेंबरला आम्ही विधीमंडळाचे कामकाज संपल्यावर दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे