मुंबई – भाजप विरोधात असलेल्या इंडिया आघाडीची सध्या देशभर चांगलीच चर्चा आहे. असं असलं तरी भविष्यातील निवडणुकांमध्ये ही आघाडी नेमकी कशी लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण इंडियामधील अनेक पक्ष एकमेकांचे विरोधक आहेत. अशात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आगामी निवडणुकांच्या रणनीतीबाबत भाष्य केले आहे.
भाजप विरोधातील पक्ष सध्या इंडिया आघाडीमध्ये एकत्र आले आहेत. यामध्ये देशभरातील अनेक पक्षांचा समावेश आहे. उद्या मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्याअनुषंगाने आज महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी इंडिया आघाडीतील पक्ष नेमके एकत्रित कसे लढणार ? यासाठी एखादी समिती काम करणार का ? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी याबाबत सविस्तरपणे आपले मत मांडले.
शरद पवार म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू केलेली नाही. पहिल्या दोन बैठका झाल्या त्या महत्त्वाच्या होत्या. उद्याच्या बैठकीत इथून पुढे सामूहिक कार्यक्रम काय असावा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्या शक्यतेवेळी असा निर्णय झाला तर काही लोकांवर ही जबाबदारी द्यावी लागेल. अन्य राजकीय घटक पक्षांशी संवाद साधून यातून आपण एकत्र जाऊ शकतो का यासंदर्भातील अभ्यास करण्याबाबत काही लोकांवर जबाबदारी सोपवावी लागेल” असं स्पष्ट मत यावेळी पवारांनी व्यक्त केले.यावेळी बाळासाहेब थोरात,नाना पटोले.उद्धव ठाकरे असे मविआमधील नेते देखील उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान पदाबाबत भाष्य
इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाबाबतचा सवाल विचारल्यावर ठाकरे म्हणाले,”पंतप्रधानांसाठी आमच्याकडे खूप पर्याय आहेत. पण भाजपाकडे काय पर्याय आहे? गेल्या दहा वर्षांत त्यांनी काय केलं? सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे. आपण कर्नाटकात पाहिलं त्यांना कोणतंच यश मिळालं नाही. बजरंग बलीनेही त्यांना आशीर्वाद दिला नाही”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.