विजय शेंडगे
“दूरदेशीच्या पाखरा’, “शिवरातलं चांदणं’, अहिराणी भाषेतील “नवलाई’ अशा तीन काव्यसंग्रहानंतर “आभाळाच्या पंखावर’ या चौथ्या काव्यसंग्रहाच्या रूपाने कवी प्रवीण देवरे पुन्हा रसिकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या मनोगताला त्यांनी “पोटातलं ओठावर’ असंच शीर्षक दिलं आहे. चौथा कविता संग्रह रसिकांच्या समोर येत असताना,
“माझ्याकडे कवितेचे असे काही खास तंत्र नाही. जसे जमेल तसे लिहीत असतो’ असं कबूल करण्याचा आणि मनोगतात तसे नमूद करण्याचा प्रामाणिकपणा कवी देवरे यांच्या अंगी आहे. व्यक्त होण्याचा तोच प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या कवितांमध्ये दिसून येतो. त्यांची कविता कुठेही “मीच जगाचा कैवारी’ असल्याचा आव आणत नाही. ती निसर्गात रमते, दुःख मांडताना थयथयाट न करता, आक्रस्ताळेपणा न करता दुःखालाही गोंजारते. हळुवारपणे रसिकांच्या समोर येते.
देवरे हे मुळात शेतकरी कुटुंबातील. त्यामुळेच त्यांची कविता शेतीमातीत रमते. निसर्गाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. पानाफुलांशी हितगुज साधू बघते. उगाच माझ्याच शिरावर ही पृथ्वी उभी असल्याचा, मी आणि माझी कविताच जगाची तारणहार असल्याचा आव देवरेंची कविता आणत नाही. शेतकऱ्यांची दुःख त्यांना माहीत आहेत.
निसर्गाचा कोप होतो तेव्हा शेतकऱ्याचे कंबरडे मोडते याची त्यांना जाणीव आहे, पण त्याविषयी लिहिताना त्यांची कविता नागर समाजावर शाब्दिक सूड उगवत नाही. जे मनात येते, ते मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न ही कविता करते.
“बहार’ या कवितेत ते नभातील तारका पावसाच्या थेंबांचे रूप घेऊन धरतीवर उतरल्या असल्याचे सांगतात. तर पाऊस कवितेत माझा पाऊस, तुझा पाऊस असे म्हणताना एकाच पावसाला अनुभवणाऱ्या प्रियकर प्रेयसीची मानसिकता व्यक्त करतात. त्याविषयी ते म्हणतात-
माझ्या अंगणातून तुझा पाऊस
धुंद होऊन हसतो
तुझ्या अंगणातला माझा पाऊस
मंद स्मित झेलतो
ही कविता स्वतःला कुठली बंधने घालत नाही. मुक्तपणे व्यक्त होते. काही कवितांमध्ये अष्टाक्षरी अथवा अभंग रचनेचा बंध या कवितेने यशस्वीपणे पेलला आहे. “खोपा’ या कवितेत ते त्यांच्या पत्नीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. संसाराचा खोपा बांधताना हिंमत हरू नको, असं सांगताना मी तुझ्या सोबत असल्याचं सांगत त्यांना आश्वस्त करतात. ढगांची दिंडी, अकलेचा तारा, कशी ही माणसे?, गाऱ्हाणे, चार दाणे, पण”ती’, महाराज,
दुष्काळी साल अशा काही पक्वतेला स्पर्श करू बघणाऱ्या कविता या कविता संग्रहात आहेत ही या कविता संग्रहाची जमेची बाजू आहे. सामाजिक भान असलेली ही कविता मुक्तपणे व्यक्त होते. सामाजिक प्रश्नांना हळुवार हात घालते. देवरे यांची कविता नावीन्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करते आहे. त्यामुळे त्यांची कविता अधिकाधिक बहरत जाईल, असा विश्वास “आभाळाच्या पंखावर’ हा कवितासंग्रह देतो.