राजन लाखे कवी आणि गझलकार म्हणून साहित्यक्षेत्राला सुपरिचित आहेतच. इतकेच नव्हे तर अखिल भारतीय साहित्य मंडळाचे विश्वस्त, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष ही त्यांची ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रुजलेली आहे. काव्यक्षेत्रात, गझलक्षेत्रात विपुल लेखन केल्यानंतर त्यांनी गद्य लेखनाकडे वळण्याचा विचार केला. त्यांची ही वाटचाल आश्वासक आहे.
राजन लाखे गेली आठ वर्षे “मनातले माझ्या’ हे सदर चालवीत आहेत. चारोळी बंधातल्या चिंतनिका असं त्या सदराचं स्वरूप. त्या ओळींवरील विस्तारित चिंतन म्हणजे गुंता. हे लेखन आशय समृद्ध झालं आहे. या लेखनातून जीवनात निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांच्या गुंत्याची उकल करण्याचा प्रयत्न राजन लाखे यांनी केला आहे. परंतु पर्यटन करूनही माणूस जीवनाच्या गुंत्यात अधिकाधिक गुंतत जातो तसे या चिंतनाचे झाले आहे, ते साहजिक आहे. कारण आयुष्य अनाकलनीय आहे.
प्रस्तावनेत डॉ. न. म. जोशी म्हणतात की, “या कविता आहेत का, हे ललित गद्य आहे का? साहित्याच्या कोणत्या प्रकारात या लेखनाला बसवावं असा खास समीक्षकीय प्रश्न उभा राहील.’ डॉ. न. म. जोशी यांच्या या विधानात बरंचसं तथ्य आहे. कारण शीर्षक, त्याखाली चारोळी आणि त्या चार ओळींचा धागा पकडत केलेलं चिंतन असं या गद्य लेखनाचं स्वरूप आहे.
त्यामुळेच याला गद्यलेखन म्हणायचं की ते चार ओळींवरील चिंतन असल्यामुळे चिंतानिका म्हणत राजन लाखे यांनी चिंतनिका हा नवाच साहित्य प्रकार जन्माला घातला असं म्हणायचं हा संशोधनाचा विषय आहे. चार ओळींचा संदर्भ घेत आयुष्याविषयीचं मंथन या लेखांमध्ये आहे त्यामुळे या साहित्यकृतीला “मंथनिका’ देखील म्हणता येईल.
विचारावर विवेकाचे आवरण असेल तर या विचाराला सकारात्मक व स्थिर होण्याशिवाय गत्यंतर नाही, असं राजन लाखे यांनी त्यांच्या मनोगतात म्हटलं आहे. या गद्य लेखनाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या मनातील विचारधारेला सकारात्मकतेकडे नेण्याचा, स्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे. काळोख हा अशुभ नाही, जीवन हे क्षणभंगुर आणि अटळ आहे, जे अंतिम सत्य आहे, यासारख्या आपल्याला ज्ञात-अज्ञात अशा कितीतरी विचारधारा, विचारप्रवाह या लेखनात सापडतात.
“कालचक्र’ या लेखात सक्ती आणि संस्कार या दोन शब्दांतील फरक स्पष्ट करताना राजन लाखे यांनी फार नेमकं विधान केलं आहे. ते म्हणतात, “बोलण्यामध्ये प्रेम ठेवावं म्हटलं तर सक्तीकडे जातं आणि बोलण्यामध्ये प्रेम असावं असं म्हटलं तर ते संस्काराकडे जातं. “ठेवावे’ या शब्दांत दडलेली “सक्ती’ आणि “असावे’ या शब्दांत दडलेले “संस्कार’ सापडणे हीच राजन लाखे यांच्या या गुंत्याची उकल मानायला हवी.
“रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’ असं गझलसम्राट सुरेश भेट म्हणतात. तोच धागा पकडून “गुंतुनी गुंत्यात साऱ्या जीव माझा मोकळा’ असं राजन लाखे यांच्या बाबतीत म्हणता येईल याची प्रचिती “गुंता’ वाचल्यानंतर येते. प्रापंचिक गुंत्यात गुंतलेलो असताना नामस्मरणासाठी मनाची दारे मोकळी ठेवायला हवीत याची जाणीव गुंता वाचल्यानंतर नक्की होते. हे या गुंत्याचं बलस्थान आहे. संतोष घोंगडे यांचं अल्हाददायक मुखपृष्ठ, उत्तम निर्मिती या पुस्तकाच्या आणखी काही जमेच्या बाजू आहेत.
प्रकाशक : संवेदना प्रकाशन, पाने : 108 मूल्य : 150 रुपये