नवी दिल्ली – अग्निपथ योजनेवरून देशभरात गदारोळ सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून दगडफेक आणि रेल्वेगाड्यांची जाळपोळ केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर अशी जाळपोळ करणाऱ्यांना आमच्याकडे मुळीच जागा दिली जाणार नाही अशी स्पष्टोक्ती अग्निपथ योजना तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेले लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी केली आहे.
एका वाहिनीशी केलेल्या बातचीतमध्ये ले. जनरल पुरी म्हणाले की, अशा प्रकारच्या हिंसाचारात सहभागी होणारे लोक तीन प्रकारचे असतात. विरोधकांकडून चिथावणी दिले गेलेले लोक पहिल्या प्रकारात असतात. दुसऱ्या प्रकारात जे लोक प्रशिक्षण चालवतात ते असतात आणि तिसऱ्या प्रकारात दुसऱ्या कोणालातरी पाहुन त्यात सहभागी झालेले असतात. मात्र आता हा हिंसाचार मान्य केला जाणार नाही.
उमेदवारांनी त्यांचे सर्टीफिकेट गोळा करण्याच्या कामाला लागावे आणि लवकरच प्रशिक्षणात सहभागी व्हावे. ते पुढे म्हणाले की, उमेदवारांच्या नाराजीची सरकारलाही कल्पना आहे. मात्र त्यांच्यातील 25 टक्के विद्यार्थी भारतीय लष्करासोबतच राहणार आहेत. उर्वरीत 75 टक्के जण देशाची शक्ती म्हणून समाजात उदयाला येतील.
या अग्निविरांना 10 टक्के आरक्षण दिले जाणार आहे. चार वर्षांनंतर त्यांना जवळपास 12 लाखांचे पॅकेज मिळणार आहे. त्यातूनही ते स्वत:चा रोजगार सुरू करू शकतील. आपल्या भावा- बहिणींना शिकवू शकतात.
पुरी पुढे म्हणाले की योजना तयार करताना अगोदर उद्योजकांशीही चर्चा करण्यात आली होती. तुमच्याकडे शिस्त असेल तर तुमच्या 80 टक्के गोष्टी पूर्ण होतात. शिस्तीमुळेच तुमच्या कार्यक्षमतेत वाढ होते. देशाच्या सुरक्षेची तुम्ही पैशांशी तुलना करू शकत नाही. जेव्हा देशाच्या सुरक्षेचा मुद्दा येतो तेव्हा पेन्शन वगैरे विषयांशी त्याची तुलना होत नाही. चार वर्षांनंतर जे अग्निवीर येथून बाहेर पडतील त्यांना रोजगाराची कोणतीच अडचण असणार नाही अशी निसंदिग्ध ग्वाही त्यांनी दिली.
…………..