दहिवडी – “आमचं ठरलंय’ गटाच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा शुक्रवार 13 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता दहिवडी येथील बाजार पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाई, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह सर्व पक्षातील सर्वपक्षीय प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत.
सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या “आमचं ठरलंय’ गटाची आजपर्यंत अनेक गुप्त खलबंत, बैठका विविध ठिकाणी झाल्या आहेत. माण-खटावमध्ये परिवर्तन करायचेच या निर्धाराने हे सर्वजण एकत्र आलेले आहेत. सर्वानुमते विधानसभेसाठी एकच उमेदवार उभा करायचा निश्चय त्यांनी केला आहे. प्रसंगी माघार घ्यावी लागली तरी हरकत नाही अशी भूमिका यातील प्रत्येकाची आहे. ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे काम मी स्वतः उमेदवार आहे असे समजून करणार असल्याचे अभिवचन देण्यात आले आहे.
या गुप्त बैठकांमध्ये नक्की काय ठरलं हे जाणून घेण्याची उत्सुकता सामान्य जनतेला आहे. तसेच नेमका उमेदवार कोण असेल याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. त्यामुळे या निर्धार मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. हा निर्धार मेळावा भव्य दिव्य करण्यासाठी “आमचं ठरलंय’च्या सर्वच नेत्यांनी कंबर कसली आहे. आपआपल्या कार्यकर्त्यांना निर्धार मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा निर्धार मेळावा माण-खटावच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन “आमचं ठरलंय’च्या नेत्यांनी केले आहे.