बुध -उपलब्ध पाण्याचे नियोजन व वितरण व्यवस्थेचा परिपूर्ण वापर करण्यासाठी पाणी वापर संस्थांची चळवळ आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर करून त्यातून उभे राहिलेल्या पिकातून शेतकऱ्यांना दोन पैसे कसे मिळतील याचा विचार करतांना पाण्याची उत्पादकता कशी वाढता येईल यात पाणी वापर संस्थांची भूमिका खूप महत्त्वाची आहे असे प्रतिपादन जलसंपदाचे सहसचिव डॉ.संजय बेलसरे यांनी केले.
पुणे येथील यशदामधील जलसाक्षरता केंद्राच्यावतीने पाणी वापर संस्था व पाण्याचा कार्यक्षम वापर यावरील ऑनलाइन आढावा बैठकीत ते बोलत होते. जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे, कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे, भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, प्रकाश जाधव (माण, खटाव), मनोज अनपट (सातारा) व मान्यवर या बैठकीत सहभागी झाले होते.
डॉ. बेलसरे म्हणाले, आजच्या काळात पाणी वापर संस्थांना महत्त्व आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाण्याचे नियोजन व वितरण करावे, हा पाणी वापर संस्था स्थापन करण्याचा हेतू आहे. पाणी वितरणात उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ बसविण्याची कसरत होत असली तरी त्यावर मात करता येऊ शकते. त्यासाठी पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण,पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, पाणी व्यवस्थापनात महिलांचा सहभाग वाढविणे, वितरणात पारदर्शकता व सुसूत्रता, पाणी वापर संस्थाकडे पाणी मागणी अर्ज, पाणीपट्टी ऑनलाइन भरण्याची सुविधा यावर भर देण्यात येईल. या बैठकीत करण्यात आलेल्या सूचनांपैकी ऑनलाइन प्रणाली व प्रशिक्षण देणे या बाबींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन डॉ. बेलसरे यांनी दिले. ग्रामपंचायत स्तरावर पाण्याचा ताळेबंद तयार करताना जलदूतांना येणाऱ्या अडचणी, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची समस्या, पाणी वापर संस्थाच्या अडचणी, यावर चर्चा झाली.