पिंपरी -पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणामध्ये आजअखेर 3.99 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी पुढील साडेचार महिने पुरेल असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाच टक्के पाणीसाठा कमी आहे.
मावळसह पिंपरी चिंचवड शहराचा पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणून पवना धरणाकडे पाहिले जाते. धरणाची पाणी साठवण क्षमता 8.51 टीएमसी आहे. पवना धरणाची पाणीपातळी 4995.80 दसलक्ष घनफूट आहे. सद्यस्थितीत धरणामध्ये 47 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. मागील वर्षी आज अखेर धरणामध्ये 52 टक्के पाणीसाठी शिल्लक होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पवना धरणात पाच टक्यांनी पाणीसाठा कमी आहे.
एप्रिल महिना सुरू झाला असून शहरामध्ये उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला असून सद्यस्थितीत नागिरकांना पाण्याची टंचाई जाणवत आहे. शहरासाठी पवना धरणातून 480 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधाऱ्यांतून ते पाणी उचलून शुद्ध करून शहराला पुरवले जाते. तर एमआयडीसीकडून 30 एमएलडी शुद्ध पाणी घेतले जाते. असे दररोज 510 एमएलडी पाणी शहराला पुरवले जाते.
शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार पाहता शहरासाठी आंद्रा व भामा-आसखेड येथून पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पांचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना सद्यस्थितीत मिळणाऱ्या 510 एमएलडी पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. पवना धरणामध्ये साडेचार महिने पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक असला तरी दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने शहरवासियांना उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.