Water conservation recruitment Exam paper | महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृदू व जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी भरती परीक्षा मंगळवार (दि. 20) आणि बुधवार (दि. 21) असे दोन दिवस घेण्यात आली. मात्र आज बुधवारच्या परीक्षेदरम्यान पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. अमरावती केंद्रावर हा पेपर फुटीचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे मृदू व जलसंधारण विभागाच्या एका कर्मचाऱ्यानेच पेपर फोडल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृदू व जलसंधारण विभागाच्यावतीने विविध पदांसाठी नुकतीच जाहिरात देण्यात आली होती. या पदांसाठी 20 व 21 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी अमरावती येथील परीक्षा केंद्रावर पेपर फुटीची घटना घडली. विभागाच्या कर्मचाऱ्याने परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडून उत्तरे पुरवण्यास मदत केल्याचा आरोप आहे.
ही परीक्षा संगणक आधारित होती. प्रत्येक सत्राच्या प्रश्न पत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या गेल्या. एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल पहिले सत्र ते अंतिम सत्र या मधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची काठीण्यता यांचे समाणीकरण करण्याचे पध्दतीने गुणांक निश्चीत करून जाहीर करण्यात येणार आहे.
विभागाच्याच कर्मचाऱ्याने पेपर फोडल्याचे पुरावेही काही विद्यार्थ्यांनी बाहेर पाठवले असल्याचे समजते आहे. दरम्यान, काही दिवसांआधी तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेतील गुणांवरून मोठा गोंधळ झाला होता. तो अद्याप सुटलेला नाही. त्यानंतर आता मृदू व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी पदासाठी बुधवारी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.