वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर; पालिका, पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
रस्ता रुंदीकरण निरुपयोगी
एसटी बसस्थानकासमोर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बांधकाम विभागाने हा रस्ता रुंद केला आहे. मात्र, पाचगणी-महाबळेश्वर ला जाणारे पर्यटक परिसरातील हॉटेल्स व दुकानांसमोर रस्त्यावरच गाड्या उभ्या करून खरेदी करतात. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा उपयोग झालेला नाही. येथे वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध करावी लागणार आहे.
वाई – वाई शहरातील वाहतूक आराखड्याच्या मंजुरीचे कारण पुढे करत पोलीस व पालिका प्रशासन कारवाई करण्यास चालढकल करत असल्याने वाई शहरातील रस्त्यांवर पुन्हा बेसुमार अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. अतिक्रमणांमुळे वाई शहराचा श्वास गुदमरतोय. आधीच खड्ड्यांमुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम तीव्रतेने राबवण्याची गरज आहे. मात्र, वाई पालिका व पोलीस प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
शहरातील सर्व रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमणे वाढली असतानाच तेथे चारचाकी व दुचाकी वाहने अवैधरित्या उभी केली जातात. त्यामुळे नागरिकांना नीट चालता येत नाही. चौकाचौकात अवैधरित्या पार्क केलेल्या वाहनांवर पोलीस पुकारा करून कारवाई करतात; परंतु पोलीस गाडी व क्रेन पुढे गेली की, पुन्हा तेथे वाहने पार्क केली जातात. गणपती आळी, रामडोह आळी या व अन्य गल्ल्यांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा गाड्या पार्क करण्यात येतात. तेथील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना स्वतःचे पुरेसे पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जातात. त्यातच पुन्हा एकदा अतिक्रमणांनी डोके वर काढले आहे.
पालिकेने पार्किंगसाठी अनेक जागा नियोजित केल्या; परंतु तेथे कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. शहरातील मुख्य रस्त्यावर बसस्थानक ते विराटनगर दरम्यान दोन्ही बाजूंना असंख्य वाहने उभी केली जातात. तेथील रस्त्याचे रुंदीकरण झाले असले तरी वाहनांच्या पार्किंगमुळे हा उद्देशच मागे पडला आहे. अतिक्रमणांकडे पालिका प्रशासन व पोलिसांचे साफ दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. किसनवीर चौक ते चित्रा टॉकिज रस्ता, महागणपती मंदिरासमोरील चौक, किसनवीर चौक ते जैन मंदिर, किसनवीर चौक ते सरकारी दवाखाना या रस्त्यांवरही दोन्ही बाजूंना दुचाकी उभ्या असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. या परिसरात मुख्य बाजारपेठ असून दुकानांचे नामफलक व जाहिरात फलकदेखील रस्त्यावर ठेवल्याने नागरिकांना जीव मुठीत घेवून चालावे लागते.
माल वाहतूक करणारी वाहने माल उतरविण्यासाठी कोठेही उभी केली जात असल्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो. शहरात अनेक ठिकाणी पार्किंगसाठी जागा न सोडता बांधकामे सुरू आहेत. पालिका प्रशासनाचा दरारा नसल्याने नियमांचे उल्लंघन करून चार मजली इमारती उभ्या राहत आहेत. वाईकरांशी चर्चा करण्यासाठी प्रशासनाने आढावा बैठक घेतली होती. मात्र, त्यात झालेल्या चर्चेनंतर ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ही बैठक म्हणजे फार्स ठरली आहे. अशी स्थिती असल्याने “कुठे नेऊन ठेवली आहे वाई माझी’, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.