महाबळेश्वर -गृह सचिवांच्या पत्राच्या आधारे जिल्हाबंदी ओदशाचे उल्लंघन करून पुणे जिल्ह्यातून महाबळेश्वरमध्ये आलेले येस बॅंक घोटाळ्यातील संशयित आरोपी व प्रसिद्ध उद्योगपती कपिल वाधवान, त्यांचे कुटुंबीय व नोकरचाकरांचा इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनचा 14 दिवसांची कालावधी संपुष्टात आल्याने या सर्वांना पुढील 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन करण्यात येणार असल्याचे समजते. मात्र, या प्रकरणाचा उडालेला धुरळा दिल्लीपर्यंत पोहोचल्याने स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळेच हे अधिकारी माध्यमांना कोणतीही माहिती देत नसल्याची चर्चा आहे.
येस बॅंक घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय व सीबीआयच्या रडारवर असलेले उद्योगपती वाधवान बंधू आपल्या कुटुंबकबिल्यासह 20 मार्च रोजी मुंबईहून लोणावळ्याजवळ तुंगार्ली येथील पिकॉक व्हॅली सोसायटीमधील भाड्याच्या बंगल्यांमध्ये राहायला आले होते. त्यांनी सहा दिवसांसाठी दोन बंगले आरक्षित केले होते; परंतु चारच दिवसांत लॉकडाऊन जाहीर झाल्याने वाधवान कुटुंब नोकरचाकरांसह लोणावळ्यात अडकले होते. त्यानंतर 8 एप्रिल रोजी वाधवान कुटुंबीयांनी लोणावळा सोडून महाबळेश्वरला आपल्या दिवाण व्हिला बंगल्यात येण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी वाधवान बंधूंनी गृह विभागाचे सचिव अमिताभ गुप्ता यांचे पत्र घेतले. त्यामुळे त्यांचा महाबळेश्वरपर्यंतचा प्रवास सुकर झाला तरी त्यांना पत्र देणे गुप्तांच्या अंगलट आले. गुप्ता यांना राज्य शासनाने तातडीने सक्तीच्या रजेवर पाठविले. वाधवान यांनी जिल्हाबंदीचा ओदश झुगारल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांची चौकशी केली.
वाधवान यांच्यासह 23 जणांना 9 एप्रिलपासून पाचगणीत इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले. याचा कालावधी आज 22 संपल्याने त्यांना आता 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात सीबीआयचे अधिकारी चौकशीसाठी पाचगणीत आले होते; परंतु त्यांना क्वारंटाइन कक्षात जाण्यास मनाई करण्यात आल्याने हे पथक रिकाम्या हाताने परतले होते. पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील व पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांनी याबाबत माहिती देण्यास असमर्थता दर्शविली.