पुणे – मराठी, हिंदी चित्रपटात तसेच हिंदी नाट्यसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे मंगळवारी रात्री उशिरा दीर्घ आजाराने पुण्यात औंध येथे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या 79 वर्षांच्या होत्या. गेल्या दीड वर्षापासून त्या पोटाच्या कॅन्सरशी झगडत होत्या. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, वहिनी, भाचा, भाचेसून असा परिवार आहे. बाणेर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बावकर या नाट्यदिग्दर्शक, अनेक नाट्यधर्मींचे गुरू असलेले इब्राहिम अल्काझी यांच्या तालमीत तयार झाल्या. त्यांनी बरीच वर्षे दिल्ली येथील रंगभूमीवर अनेक नाटकांमध्ये कामे केली. त्यामध्ये ऍथेलो, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्या “तुघलक’ या नाटकातही काम केले. लेखक जयवंत दळवी यांच्या “संध्या छाया’ नाटकाचे “कुसुम कुमार’ या नावाने हिंदीत रूपांतर करून त्याचे दिग्दर्शनही बावकर यांनी केले होते.
सन 1984 मध्ये त्यांना “हिंदी थिएटर’साठी “संगीत नाटक अकादमी पुरस्कारा’ने सन्मानित केले होते. तर 1988 मध्ये “राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’ने सन्मानित केले होते.
“एक दिन अचानक’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या त्या विद्यार्थिनी होत्या. तेथे त्यांनी अध्यापनाचेही काम केले. मराठीमध्ये “दोघी’, “उत्तरायण’, “शेवरी’, “रेस्टॉरन्ट’, “वास्तुपुरुष’, “हा भारत माझा’, “संहिता’, “नितळ’, “बाधा’ या चित्रपटात त्यांनी काम केले. चित्रपटात कोणतीही ताकदवान स्त्रीची व्यक्तिरेखा असली की, उत्तराताईंची आठवण सुमित्रा भावे यांना व्हायची. कारण त्या ती ताकदीने निभवायच्या. “संवाद’ नावाच्या आमच्या लघुपटात त्यांनी काम केले होते. “दोघी’ चित्रपटात शेतकरी महिलेची भूमिका त्यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी घेतलेले भाषेचे कष्ट, त्यानंतर “वास्तुपुरुष’ या चित्रपटातील ब्राह्मण घरातील आईची व्यक्तीरेखा या दोन्हीसाठीचे घेतलेले कष्ट आम्ही पाहिले आहेत, असे चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी म्हटले आहे.