मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या वक्तव्यांवरुन युतीमध्ये तणाव निर्माण झाल्याची परिस्थिती होती. त्यातच शिवसेनेच्या जाहिरातीमुळे युतीमधील तणाव आणखीच चिघळला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर शिवसेना-भाजप युतीमधील तणाव निवळला.
मात्र असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी भाजप आणि शिवसेना यांच्याकडून आपापल्या स्तरावर काळजी घेतली जात आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद टाळण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांना पक्ष श्रेष्ठींकडून मौखिक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
राज्यात कुठेही होर्डिंग लावताना राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी असेल तर त्यांना प्रदेशाध्यक्षांची आणि जिल्हा स्तरावरील पदाधिकारी असेल तर जिल्हा अध्यक्षांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शिवाय मीडिया संवादासाठी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांशिवाय कोणीही मीडियाशी बोलणार नाही, अशी तंबी देण्यात आली आहे.
जाहीर कार्यक्रमात भाषण देताना भाजप-शिवसेना महायुतीत तणाव वाढेल अशी वक्तव्ये न करण्याची ताकीद सुद्धा भाजप पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.