पावसामुळे झाली उत्पादनात घट
सातारा – जिल्ह्यात मागील पंधरवड्यात मुसळधार पावसाने सर्वत्र धुमाकुळ घातल्याने बळीराजा सुखावला असला तरी पिकांना यांचा चांगलाच फटका बसला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे भाज्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. भाज्याचे दर कडाडल्याने ज्या घरात भाज्यांचा ढीग दिसत होता आता तो कुठेतरी कमी झाला आहे. कांद्याने चढे भाव गाठल्याने गृहिणीच्या डोळ्यात पाणी आले असून वांगी, फ्लॉवर, कोबी, आले, कारले, तोंडली, गवार, पावटा यांच्या दराने शंभरी ओलांडल्याने सर्वसामान्यांच्या किचनमधून या भाज्या सध्या तरी गायब होत आहेत.
आठ दिवसांपासून भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असल्यामुळे जेवणाच्या ताटात भाज्याच्या पंगत गायब झाली असून त्याची जागा आता कडधान्य आणि मांसाहाराने घेतली आहे. मागील काही दिवसात परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवल्याने शेतमालाचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाने मेथी, कोथिबीर, पालक, चाकवत, याचबरोबर वांगी, टोमॅंटो, भेंडी, गवार, पावटा, दोडका, हिरवी मिरची इत्यादी भाजीपालाची पिके भुईसपाट झाल्याने आवक घटली आहे. तसेच किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच सणासुदीचे दिवस असल्याने शाकाहाराला प्राधान्य दिले जात असल्याने भाज्यांची मागणी वाढली आहे. श्रावणी सोमवार व उपवासासाठी पालेभाज्यांची मागणी वाढली आहे.
पुणे ते कोल्हापूर हा महामार्ग तब्बल आठ दिवस बंद राहिल्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा थंडावला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात जनजीवन पूर्वपदावर येत असताना त्याला ऐन श्रावणात महागाईची झळ बसू लागली आहे. नाशिक पुणे कोल्हापूर, बारामती येथून होणारी आवक घटल्याने भाजीपाला महागला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आहारात भाज्या दुरापास्त झाल्या आहेत. हॉटेलमध्येदेखील मेथीच्या भाजी ऐवजी मेथीचं पिठलं येवू लागलं आहे. भाज्यांचे दर ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच चढे राहिले आहेत.
मागील आठवडयापासून ते स्थिर असून कमी होण्याचे चिन्ह दिसत नाहीत. सर्व भाज्यांचे किलोचे दर याप्रमाणे कारले 40 ते 60 रुपये किलो, गवार 100 ते 120 रुपये, भेंडी 80 ते 100 रुपये, तोंडली, 80 ते 100 रुपये किलो, आहेत. पावटा 120 रुपये किलो, दोडका 80 रुपये किलो, फ्लॉवर 120 रुपये किलो, कोबी 80 रुपये किलो दराने विक्री होत आहेत. सर्वसामान्यांची सकाळ कांदा पोहयाने होत असून कांद्याने पंचविशीचा दर गाठल्याने पोहयामध्ये कांदा घालताना विचार कारावा लागत आहे. कोथिंबिरी छोटी जुडी 15 रुपयांना झाल्यामुळे मसाल्यातून तिला वगळले जात आहे.