पत्रकार, कथा, कादंबरी, नाटक, ललित गद्य, व्यक्तिचित्र, चिंतनात्मक लेख, चित्रपटकथा, प्रवासवर्णन असे विविध साहित्यप्रकार हाताळणारे अष्टपैलू व प्रतिभासंपन्न लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे यांचा आज जन्मदिन. 12 एप्रिल 1910 रोजी त्यांचा धुळे येथे जन्म झाला. बालपणीच त्यांच्या आईचे निधन झाल्यामुळे त्यांचे संगोपन त्यांच्या आजोबांनी केले. नागपूरच्या हिस्लॉप आणि लॉ कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांनी “ओम् फस्’ ही कथा लिहिली व आपल्या लेखनाचा श्रीगणेशा केला. वि. दा. सावरकरांच्या विचारसरणीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या नागपूरच्या “सावधान’ या साप्तहिकातून त्यांचे लेख वर्ष 1936 मध्ये प्रसिद्ध होऊ लागले. त्यांच्या भाषासौंदर्याने व तेजस्वीपणाने लिहिलेल्या लेखनामुळे ते अल्पावधीतच वाचकांमध्ये लोकप्रिय झाले. अच्युत बळवंत कोल्हटकर व शिवराम महादेव परांजपे या दोन प्रसिद्ध साहित्यिकांच्या लेखनाचा त्यांच्या भाषाशैलीवर प्रभाव पडला होता. वर्ष 1941 मध्ये त्यांनी “आदेश’ नावाचे साप्ताहिक सुरू केले व वर्ष 1948 पर्यंत त्यांचे अनेक चित्तवेधक लेख त्यात प्रसिद्ध झाले.
भावे सनातन भारतीय संस्कृतीचे व जीवनमूल्यांचे उपासक असले, तरी कर्मठ नव्हते, प्रतिगामी नव्हते. हिंदू समाजाच्या ऐक्याला विघातक अशा जातिभेदादी गोष्टींवर ते टीका करीत. जीवनातील दिव्यत्व, पौरूष, सौंदर्य यांचे ते पूजक होते. स्वातंत्र्याचा पुरस्कार करीत असतानाच ते स्वैराचारावर टीका करीत. जीवनातील दांभिकतेचा व ढोंगीपणाचा त्यांना तिटकारा होता.
मराठी नवकथेचे एक प्रवर्तक म्हणून त्यांचे नाव घेतले जात असले, तरी त्यांनी जुन्या कथेशी नाते जपले होते. “सतरावे वर्ष’, “सीमेवर’, “सावल्या’, “काळ, काम आणि वेग’, “स्वप्न’, “ध्यास’, “मुक्ती’, “रूप’, “प्रतारणा’, “पुतळा’, “दुःख’, “फुलवा’, “पहिले पाप’, “संगम’, “घायाळ’, “नौका’ यांसारख्या अप्रतिम कथा त्यांनी लिहिल्या. त्यांचे एकूण सत्तावीस कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. नाटककार म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी जीवनातील तारुण्य व कारुण्य, शाश्वतता व नश्वरता प्रभावीपणे दाखवून दिली आहे. करुणरसाबरोबर हास्यरसाचेही दर्शन ते तेवढ्याच ताकदीने घडवितात. “आइस्क्रिम’ ही त्यांची विनोदी कथा या दृष्टीने उल्लेखनीय आहे. विषकन्या (1943), स्वामिनी (1956), महाराणी पद्मिनी (1971) ही त्यांची गाजलेली नाटके. “सौभाग्य’ आणि “माझा होशील का?’ या चित्रपटांच्या कथा त्यांनी लिहिल्या होत्या. उत्तर-दिग्विजय (1964-65) आणि चितोड यात्रा (1968-69) ही त्यांची प्रवासवर्णने प्रसिद्ध आहेत.
ते स्त्रीव्यवस्थेचे विलक्षण हळुवारपणे चित्रण करतात. अडीच अक्षरे (1963) या कादंबरीतून प्रेमभावनेचे विविध पदर उलगडून दाखविले आहेत. त्यांच्या आग (1961), रोहिणी (1962), पिंजरा (1964), मागं वळून (1966), सायंकाळ (1968), व्याध (1969), रखमाच्या मुली (1974) इत्यादी कादंबऱ्यांतून मानवी विकार व नियतीच्या प्रभावाचे अप्रतिम चित्रण करतात. त्यांच्या एकूण एकोणीस कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. वर्ष 1980 मध्ये त्यांचे “प्रथमपुरुषी एकवचनी’ हे आत्मचरित्रही प्रसिद्ध असून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली, हे त्यातून त्यांनी नमूद केले आहे.
वर्ष 1964 मध्ये अहमदनगर येथे भरलेल्या मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी तसेच पुणे येथे वर्ष 1977 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती. 13 ऑगस्ट 1980 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
माधव विद्वांस