माधव विद्वांस
साहित्यिक आणि विचारवंत आणि व्याख्याते गंबा तथा गंगाधर बाळकृष्ण सरदार यांची आज जयंती. त्यांचा जन्म जव्हार या आदिवासी भागातील गावात 2 ऑक्टोबर 1908 रोजी झाला. जव्हारमध्ये त्यांच्या वडिलांचे दुकान होते. त्यांच्या एकत्र कुटुंबात सरदारांना पाच बहिणी, तीन चुलत भावंडे, काकू, आत्या, मावशी असा मोठा गोतावळा होता.
सर्व कुटुंब समतावादी होते. त्यांचा जन्म व बालपण जव्हारमध्ये आदिवासीबहुल भागात झाल्याने आदिवासींचे जीवन, दु:ख आणि समस्या यांचा अनुभव सरदारांना जवळून घेता आला. त्यांचे शालेय शिक्षण जव्हार येथे तर माध्यमिक शिक्षण दादर येथील छबिलदास हायस्कूलमधून झाले. ते वर्ष 1924 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे एमए पर्यंत झाले.
1934 मध्ये एमए झाल्यानंतर 7 वर्षे सरदारांना नोकरी मिळाली नव्हती. वर्ष 1937 मध्ये त्यांनी पीएच.डी.ची पूर्वतयारीसाठी एकोणिसाव्या शतकातील गद्याचा अभ्यास केला व “अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका’ हा त्यांचा पहिला ग्रंथ तयार झाला. त्यांची 1941 मध्ये पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला महाविद्यालयात मराठीचे व्याख्याते म्हणून नेमणूक झाली, तर तेथूनच 1968 मध्ये मराठीचे प्रपाठक म्हणून सेवानिवृत्त झाले.
शालेय जीवनापासून स्वामी रामतीर्थ, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. 1930 सालच्या मिठाच्या सत्यागहात सहभागी होऊन ते गांधीवादाकडे वळले. सत्याग्रहामध्ये त्यांनी तुरूंगवासही भोगला. तथापि, देशातील बदलत्या परिस्थितीत ते साम्यवादी तत्त्वज्ञानाकडे ओढले गेले आणि साम्यवादी भूमिकेतून ते सामाजिक प्रश्नांचा आणि धर्माचा विचार करू लागले.
मात्र, सक्रिय राजकारणापासून दूर राहून वैचारिक पातळीवरून लेखन-भाषणांद्वारा सामाजिक प्रबोधनाच्या कार्यात स्वत:ला गुंतवून घेतले. सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने सरदारांनी लिहिलेल्या ग्रंथांत महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी (1941), न्या. रानडेप्रणीत सामाजिक सुधारणेची तत्त्वमीमांसा (1973), आगरकरांचा सामाजिक तत्त्वविचार (1975), महात्मा फुले : विचार आणि कार्य (1981) अशा काही ग्रंथांचा समावेश होतो.
त्याचप्रमाणे प्रबोधनातील पाऊलखुणा (1978), नव्या युगाची स्पंदने (1984), नव्या उर्मी, नवी क्षितिजे (1987), परंपरा आणि परिवर्तन (1988) या त्यांच्या स्फुट लेखांच्या संपादित संग्रहांतूनही त्यांचे सामाजिक प्रबोधनविषयक विचार दिसून येतात. यातून इंग्रजी राजवटीतील भाऊ महाजन, लोकहितवादी, विष्णुबुवा बह्मचारी, म. जोतीराव फुले, विष्णुशास्त्री पंडित यांच्या सामाजिक कार्याची विस्तृत माहिती सरदारांनी दिली.
त्यांच्या स्फुट लेखांतून तत्कालीन भारतीय राष्ट्रवाद आणि ऐहिक निष्ठा, नवीन महाराष्ट्र राज्याचे भवितव्य, शिक्षणाबरोबर संस्कृतीसंवर्धन, संकुचित धार्मिक पगड्यामुळे प्रबोधनाला पडणाऱ्या मर्यादा अशा अनेक विषयांवर त्यांनी विचार मांडले आहेत. त्याचप्रमाणे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू छत्रपती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील या थोर समाजसुधारकांच्या कार्याचाही परिचय त्यांनी करून दिला आहे.
त्यांच्या लेखांतून दलित साहित्याचे समालोचनही त्यांनी केले आहे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा आघाड्यांवर संघर्ष करून जनमानसात नवीन जाणिवा रूजवणाऱ्या दलित साहित्यिकांचे विद्रोही लेखनाचे सरदारांनी स्वागत केले आहे.
14 जानेवारी 1978 सालच्या तसेच बार्शी येथील 54व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. तसेच मुंबई येथे भरलेल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. 9 डिसेंबर 1988 रोजी त्यांचे निधन झाले.