– अमित डोंगरे
दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याने तब्बल दोन वर्षांनंतर आयपीएलचा सामना खेळला. त्यात त्याने स्वतःला सिद्धही केले. त्यानंतरच्याही काही सामन्यांत त्याने सरस गोलंदाजी केली. मात्र, आता त्याचा तो पूर्वीचा बाउन्सर, इनस्विंगर किंवा आऊटकटर दिसेनासा झाला आहे. त्यामुळे फार काळ वाट न पाहता आता त्याने आयपीएलला रामराम केलेला बरा. सन्मानाने निर्णय घेणे संघातून वगळ्याच्या मानहानीपेक्षा कधीही चांगले असते.
ईशांतने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तब्बल 717 दिवसांनंतर थाटात पुनरागमन केले. मिळालेल्या संधीचे सोने करताना त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढतीत अत्यंत भेदक गोलंदाजी करताना 4 षटकात 19 धावांत 2 गडी बाद केले व दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तसेच त्याने सोमवारी झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धही सुरेख गोलंदाजी केली.
त्याने 3 षटकांत 18 धावांत 1 बळी घेतला. त्याची धावा देण्याची सरासरी आयपीएल स्पर्धेतील अन्य गोलंदाजांपेक्षा निश्चितच सरस आहे. मात्र, आता त्याचे वय वाढल्याचे सहज कळून येते. आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत त्याने 95 सामने खेळताना 75 बळी मिळवले आहेत.
ईशांतने भारताकडून 2008 साली कसोटी पदार्पण केले ते देखील बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यातही त्याने त्यांचा सर्वात महत्त्वाचा फलंदाज रिकी पॉंन्टिंग याला सरळ सरळ मामा बनवला. तेथूेनच त्याची कारकीर्द सुरूच झाली नाही तर बहरली. वेग, दिशा, टप्पा व स्विंग यांच्या जोडीला ताडमाड उंचीमुळे मिळणारा बाउन्सर ही त्याची प्रमुख अस्त्रे होती. 2013 सालानंतर त्याला सातत्याने दुखापतींचा सामना करावा लागला.
जसप्रीत बुमराह, महंमद शमी संघात आल्यावर तर ईशांत अडगळीत गेला. त्याला भारतीय संघात सिझनल फळांसारखे पुनरागमन करण्यात यश येत होते. मात्र, संघातील स्थान कायम राहात नव्हते. एकूणच त्याची कारकीर्द आता अखेरच्या वळणावर आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा पार पडल्यावर त्याने सन्मानामे निवृत्त होणे गरजेचे आहे.
त्यानंतर त्याला आयपीएलमधीलच कोणत्याही संघाकडून सपोर्टस्टाफमध्ये आपली सेकंड इनिंगही सुरू करता येईल. मात्र, एखाद्या नवोदितासाठी जागा अडवणे योग्य नाही. एक गोलंदाज म्हणून ईशांत खरोखर हुशार होता व गुणवानही होता. आता त्याच्या याच गुणांचा लाभ त्याने नव्या पिढीसाठीही द्यावा हीच अपेक्षा.