नवी दिल्ली – देशातील कोविडची तिसरी लाट रोखायची असेल तर लोकसंख्येच्या किमान 60 टक्के लोकांना कोविड लसींचे दोन्ही डोस देण्याची प्रक्रिया पुर्ण केली गेली पाहिजे अशी आवश्यकता आहे. पण आज देशातील केवळ 42 टक्के लोकांचेच दोन डोसचे लसीकरण डिसेंबर अखेरपर्यंत पुर्ण होणार आहे.
त्यामुळे समाजातील मोठा वर्ग अजूनही लसीकरणवाचून वंचित आहे. त्यांचे लसीकरण कधी पुर्ण करणार आणि लोकांना बुस्टर डोस देणे कधी सुरू करणार असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटवर सध्या केल्या जाणाऱ्या लसीकरणाच्या आकडेवारीचा तपशीलही सादर केला आहे. त्याच्या अनुषंगाने राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सध्याच्या लसीकरणाचे प्रमाण लक्षात घेतले तर डिसेंबर अखेरपर्यंत केवळ 42 टक्के लोकांच्या लसीकरणाची प्रक्रिया पुर्ण होणार आहे.
तिसरी लाट रोखायची असेल तर एव्हाना किमान 60 टक्के लोकांचे लसीकरण पुर्ण होणे गरजेचे आहे. हे प्रमाण लवकर साध्य करायचे असेल तर रोज किमान 61 दशलक्ष लोकांना लस दिली गेली पाहिजे, पण प्रत्यक्षात हे प्रमाण सध्या केवळ 5.8 दशलक्ष इतकेच आहे. हे लक्षात घेतले तर गेल्या सात दिवसांतील लसीकरणाचा शॉर्टफॉल खूपच प्रचंड आहे.