लखनौ – उत्तर प्रदेशात शनिवारी एक टेम्पो दरीत कोसळून 12 जण मृत्यूमुखी पडले, तर 41 जण जखमी झाले आहेत. ही घटना इटावा जिल्ह्यातील बढपुरा पोलीस ठाण्याच्या क्षत्रात मिहौली जवळ घडली.
आगराचे गाव पिनाहट येथील वैजनाथ बघेल यांनी मुलासाठी नवस बोलला होता. त्यांना मुलगा झाल्याने ते नवस फेडण्यासाठी गावातील लोकांसह कालका देवी मंदिरामध्ये जात होते. गाडीत जवळपास 60 हून अधिक लोक होते. यामध्ये 20 महिलांचाही समावेश होता. अशी माहिती जखमींपैकी एकाने पोलिसांना सांगितली.
या अपघातावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी शोक व्यक्त केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भाविकांनी भरलेला टेम्पो दरीत कोसळला. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून 41 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी जिल्हा हाॅस्पिटलमध्ये दाखल केले.