नवी दिल्ली – 1997मध्ये घडलेल्या उपहार चित्रपटगृह अग्नितांडव प्रकरणी व्यापारी सुशील अन्सल आणि गोपाल अन्सल आणि इतरांना महत्त्वपूर्ण पुराव्यांशी छेडछाड केल्याबद्दल सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. यासोबतच अन्सल बंधूंना 2.25 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. हा निर्णय दिल्ली न्यायालयाने सोमवारी दिला आहे.
पटियाला हाऊस कोर्टातील मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट पंकज शर्मा यांच्या न्यायालयाने सोमवारी उपहार आग प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या सुशील आणि गोपाल अन्सल यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली.
न्यायालयाने सुशील आणि गोपाल अन्सल यांना 2.25 कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून त्यांना कोठडीत ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. याशिवाय न्यायालयाचे माजी कर्मचारी दिनेश चंद शर्मा आणि पीपी बत्रा आणि अनूप सिंग या दोघांनाही सात वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अनेक विचारानंतर न्यायालय या निष्कर्षावर पोहोचले आहे की, पाच दोषी कठोर शिक्षेचे पात्र आहेत, असे न्यायमूर्तींनी आपल्या निर्णयात म्हटले आहे. या प्रकरणातील निकालानंतर जामिनावर बाहेर असलेल्या पाच दोषींना ताब्यात घेण्यात आले आहे.
या दुर्घटनेत 59 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात अन्सल बंधूंना दोषी ठरवण्यात आले आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र, तुरुंगात घालवलेला वेळ लक्षात घेऊन राजधानी दिल्लीत ट्रॉमा सेंटरच्या बांधकामासाठी दोघांनाही प्रत्येकी 30 कोटी रुपये द्यावे लागतील, या अटीवर सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुटका केली होती. अन्य दोन आरोपी हर स्वरूप पनवार आणि धरमवीर मल्होत्रा यांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला आहे.