मार्गसनी येथील सभेत आमदार थोपटे यांचा राज्यमंत्र्यांना इशारा
वेल्हे- स्वत:च्या तालुक्यात धरणग्रस्तांसाठी एकही गुंठा जमीन दिली नाही, ते गुंजवणीच्या पाण्यवर राजकारण करीत आहेत. शेवटच्या धरणग्रस्तांचे पुर्नवसन झाल्याशिवाय व धरणाचे पाणी भोर वेल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात फिरल्याशिवाय पाणी भोर-वेल्हेच्या शिवेच्या बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा आमदार संग्राम थोपटे यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे नाव न घेता दिला आहे.
वेल्हे तालुक्यातील अंबवणे, बोरावळे, निगडे बुद्रुक, वांगणी, वांगणीवाडी, कोळवडी, कातवडी, करंजावणे, आडवली, खांबवडी, विंझर, मालवली, दापोडे, वांजळे आदींगावासह इतर गावांत गावभेट प्रचार दौऱ्यात मार्गासनी येथील भैरवनाथ मंदिरात मतदारांशी संवाद साधताना आमदार थोपटे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, सभापती संगिता जेधे, उपसभापती दीनकर सरपाले, माजी सभापती सीमा राऊत, सविता वाडघरे, चंद्रकांत शेंडकर, राजगड कारखान्याचे संचालक संदीप नगिने, शोभा जाधव, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष तानाजी मांगडे, तालुकाध्यक्ष नाना राऊत, युवक अध्यक्ष युवराज शेंडकर आदि मान्यवर उपस्थित होते.
थोपटे म्हणाले की, वेल्हे तालुक्यात निगडे येथे क्रीडा संकुल उभारल्या शिवाय शांत राहणार नाही. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत वेल्हे तालुक्यासाठी 24 कोटी 56 लाख रुपयांचा निधी मंजुर केला आजे. भविष्यात विकासाचे एकही काम शिल्लक ठेवणार नाही, अशी ग्वाही देतो. महाआघाडीचा मी उमेदवार असून मागील दोन पंचवार्षिकमध्ये मला सेवेची संधी दिली आहे, यावेळीही पुन्हा ही संधी द्याल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाश वाडघरे तर विशाल वालगुडे यांनी आभार मानले.