वर्धा: सध्या कच-याला भाव आहे; पण साखरेला भाव नाही. ऊस उत्पादक शेतक-यांना चांगला फायदा व्हावा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून उसापासून इथेनॉलची निर्मिती केली जात आहे. विदर्भातील सहा जिल्ह्यांना डिझेलमुक्त करून इथेनॉलवर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. वर्धा येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार रामदास तडस, खासदार विकास महात्मे, वर्ध्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे, माजी खासदार दत्ता मेघे, विजय मुडे, सुरेश वाघमारे,आमदार पंकज भोयर, माजी आमदार दादाराव केचे, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक रविकांत बालपांडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे, समीर देशमुख, नगराध्यक्ष अतुल तराळे, आदी उपस्थिती होती.
दरम्यान महाराष्ट्रातील सहा जिल्हे येत्या पाच वर्षांत पूर्णतः डिझेलमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्हे डिझेलमुक्त करण्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली होती. येत्या काळात करंज झाडाच्या बियांपासून तयार केलेलं जैवइंधन किंवा बायोडिझेल या जिल्ह्यांत धावणाऱ्या वाहनांमध्ये वापरण्यात येणार आहे.
नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ग्रीन क्रूड बायोफ्यूएल फाऊण्डेशन’ या प्रकल्पावर काम करत आहे. सुरुवातीला करंजाची तीन ते चार कोटी रोपं लावली जाणार आहेत. त्याची बिजं तयार झाल्यावर चार बायोफ्यूएल प्लांट लावले जातील. त्यामध्ये तयार होणारं जैविक इंधन बाजारात उपलब्ध करुन देण्यात येईल. हे इंधन डिझेलच्या तुलनेत 15 ते 20 रुपयांनी स्वस्त असणार आहे.