पुणे -जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी तीन दिवसांपासून शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम आता जाणवू लागला आहे. राज्यासह पुणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. परंतु, अधिकारी, कर्मचारी संपात सहभागी असल्याने पंचनामे रखडले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सात तालुक्यांना फटका बसला आहे. तर मागील दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे रखडले असून संपाचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत होणे अपेक्षित आहे. जिल्हा प्रशासनाने संपातील कर्मचाऱ्यांना नोटीस काढल्या असताना याचा काहीच परिणाम झाल्याचे दिसून आलेले नाही. संपकरी मागण्यांवर ठाम असल्याने अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचमाने रखडणार की काय अशी शक्यता आहे.
मागील आठवड्यात अवकाळी पावसाचा सात तालुक्यांना फटका बसला असूून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच 44.3 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर संप सुरू झाला असताना जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने येथील पंचमाने रखडले आहेत. त्यातच बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. परंतु, कर्मचारी संपात सहभागी असल्याने मागील दोन दिवसांपासून पंचनाम्याची कुठलीच कार्यवाही झालेली नसल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे.
नायब तहसीलदारांवर जबाबदारी
शेतकऱ्यांचे पंचनामे रखडणार नाही यासाठी नायब तहसीलदार यांच्यावर जबाबदारी सोपवून स्थानिकांच्या मदतीने पंचनामे करण्याबाबत आदेश दिले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी देखील परिसरातील गावातील माहिती तत्काळ नायब तहसीलदार यांना देऊन मदत करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मतराव खराडे यांनी केले आहे.