पुणे – विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) परवानगी नसतानाही अभ्यासक्रम चालवून विद्यार्थ्यांचे नुकसान केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने पुण्यातील अभिनव कला महाविद्यालय आणि म्हैसुरू येथील श्री कला निकेतन स्कूल ऑफ आर्टस यांना साडेतीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी नाशिक येथील एका शिक्षिकेने तक्रार केली होती. आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख यांनी हा आदेश दिला आहे.
तक्रारदाराच्या वतीने आयोगात ऍड. ज्ञानराज संत यांनी बाजू मांडली. तक्रारदारांनी “फाइन आर्टस इन क्रिएटिव्ह पेंटिंग’ या विषयात पदव्युत्तर पदवीसाठी अभिनव कला महाविद्यालयात चौकशी केली होती. त्या वेळी महाविद्यालय म्हैसुरू येथील कर्नाटक राज्य मुक्त विश्वविद्यालयाशी संलग्न आणि श्री कलानिकेतन स्कूल ऑफ आर्टस यांच्याशी निगडित आहे, असे तक्रारदार शिक्षिकेला सांगण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदार यांनी 2013 मध्ये प्रवेश घेतला होता. त्यासाठी 50 हजार रुपये शुल्क भरले होते. त्यांनी दोन वर्षांचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. 15 जुलै 2015 मध्ये उत्तीर्ण झाल्याचे त्यांना कळवण्यात आले. त्यांना गुणपत्रिकाही देण्यात आली. मात्र, बराच काळ उलटल्यानंतरही त्यांना पदवी प्रमाणपत्र मिळाले नाही.
गुणपत्रिकेच्या आधारे तक्रारदारांनी एसएनडीटी महिला विद्यापीठात पीएचडी प्रवेशासाठी अर्ज दाखल केला. पण तो विद्यापीठाने फेटाळला. ज्या महाविद्यालयातून पदवी घेतली, ते यूजीसीकडून प्रमाणित नाही, असा शेरा त्यांच्या अर्जावर देण्यात आला होता. त्यावेळी तक्रारदाराला या प्रकाराचा उलगडा झाला.
आयोगाच्या आदेशात काय?
- अभ्यासक्रमाची फी 50 हजार रुपये 10 टक्के व्याजाने तक्रारदाराला परत करावी.
- वैयक्तिक नुकसान भरपाई म्हणून अडीच लाख रुपये आणि दंडात्मक नुकसान भरपाई म्हणून एक लाख रुपये तक्रारदाराला द्यावे.
- तक्रारीच्या खर्चापोटी तक्रारदाराला 25 हजार रुपये द्यावे