जयपूर – देशभरात करोनावरील लसींची टंचाई असल्याचे बहुधा केंद्र सरकारला मान्य नाही. तो धागा पकडून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्यावर निशाणा साधला आहे. लस उपलब्धतेबाबत वर्धन यांनी खोटे दावे करू नयेत, असे गेहलोत यांनी म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सातत्याने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध असलेल्या लसींच्या डोसची आकडेवारी जाहीर केली जात आहे. त्या मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या आकडेवारीनुसार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे 1 कोटी 77 लाख डोस उपलब्ध आहेत.
तो संदर्भ घेऊन गेहलोत यांनी ट्विटरवरून भूमिका मांडली. वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनसाठी देशाला झगडावे लागत असताना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे वर्धन सांगत होते. आता संपूर्ण देशात लसींचा तुटवडा आहे. मात्र, देशात 1 कोटी डोस उपलब्ध असल्याचे वर्धन म्हणत आहेत.
सगळ्या राज्यांचे एकत्रित लसीकरण विचारात घेतल्यास 1 कोटी डोस एका दिवसातच संपतील. लस टंचाईमुळे देशातील अनेक केंद्रांवरील लसीकरण बंद करण्याची वेळ येत आहे. देशभरात 2 एप्रिल या दिवशी नागरिकांना लसींचे 42 लाख डोस देण्यात आले. आता ते प्रमाण केवळ 16 लाखांवर आले आहे. वर्धन यांनी खोटे दावे टाळावेत. तशा दाव्यांमुळे जनतेत चीड उत्पन्न होत आहे, असे गेहलोत यांनी म्हटले.