यवतमाळ : अमित शहा आणि माझे ठरले होते. त्यांनी कितीही नाही म्हणोत, मी माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन शिवाजी पार्कवर हे बोललो आहे. आता पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो अडीच वर्ष शिवसेनेचा आणि अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री ठरला होता”, असा पुनरुच्चार शिवसेना(UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केला आहेे आणि अमित शाहांचं नाव घेत पुन्हा एकदा भाजपवर सत्तावाटपाचं वचन मोडल्याचा ठपका ठेवला.
विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उध्दव ठाकरेंनी यवतमाळ येथे माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,”आज जे भाजपचे जुने कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते आहेत त्यांना इतर पक्षातून आलेल्यांच्या सतरंज्या उचलाव्या लागत आहे ते घडले नसते. पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातोय”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली.
ठाकरे पुढे म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांमध्ये निकाल दिलेला आहे आणि त्या निकालाच्या चौकटीत राहूनच अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय घेतलाच, तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत, तिथे दाद मागू”, अशी भूमिका देखील उद्धव ठाकरेंनी आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय येण्यापूर्वीच मांडली आहे.