मुंबई – येत्या काही दिवसांत राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचे बालले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत मिळून मुख्यमंत्री होणार असल्याच्याही चर्चांनी जोर धरला होता. अशातच ठाकरे गटातील उरलेले सर्व 13 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. या त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, ठाकरे गटातील उरलेले 13 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यासोबतच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे 20 आमदार आणि काँग्रेसचे बडे नेतेही मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. खारघर घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून हटवलं जाईल अशी चर्चा सध्या सुरू आहे, याबाबत प्रश्न विचारला असता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. तसेच, यावेळी उदय सामंत यांनी विरोधकांवर निशाणाही साधला आहे.
यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. सामंत म्हणाले, संजय राऊत हे जगातील सगळ्यात शहाणे आणि विद्वान आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत बोलणे मी आता सोडून दिलेले आहे. त्यांच्या समोर स्पर्धक म्हणून जगात एकही विद्वान शिल्लक राहिला नाही. देशातील सगळ्या विद्वानांचे राऊत हे महामेरू बनलेले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपसोबत मिळून सरकार स्थापन केले. तेंव्हापासून राज्यातील राजकीय वातावारण सतत तापलेले असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीतील नेते सातत्याने सांगत असतात की हे सरकार काही दिवसांपुरतेच आहे. अशातच सध्या राजकीय वर्तुळात वेगवान हालचाली सुरु असल्याचेही बोलले जात आहे. शिंदे यांच्या गटातील काही आमदार अपात्र ठरल्यास सत्तापालट होऊ शकतो, असेही बोलले जात आहे.