दौंड – राज्यात 14 हजार 232 ग्रामपंचायतींसाठी निवडणुक प्रक्रिया पार पडत आहे. आज मतदानादिवशी काही ठिकाणी निवडणुकीला गालबोट लागल्याच्या घटना समोर येत आहेत. दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे मतदानादरम्यान मतदान केंद्रावरच दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना समोर आलीय. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे.
दौंड तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींसाठीच्या निवडणुक प्रक्रियेला आज सकाळी सुरूवात झाली. मतदान सुरू असतानाच कुसेगावात मतदान केंद्राच्या आवारातच दोन गटात वाद पेटला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून सौम्य लाठीचार्ज करत जमावाला पांगवले.
जळगावातील जामनेरमध्येही निवडणुकीला गालबोट –
जळगावातील जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे निवडणुकीच्या वादातून गुरूवारी रात्री दोन गटांमध्ये वाद झाला. यावेळी चाकू हल्लाही झाला असून दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच पिस्तूल रोखून धमकावण्यात आल्याचा प्रकार देखील घडला असल्याची माहिती समोर आलीय. याबाबत परस्पर विरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या प्रकारामुळे निवडणुकीला गालबोल लागले.