सातारा -सततच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक कोंडी झालेल्या सातारा शहरातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन पुढील पाच दिवसांसाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन मागे घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
प्रशासनाने लॉकडाऊन मागे घेतला नाही तर सर्व व्यापारी पेठांमधील दुकाने सरसकट सुरू करतील, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी पत्रकारांसमोर मांडली. माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण, व्यावसायिक वसंत जोशी, सुदीप भट्टड, ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी पुन्हा जाहीर झालेल्या सशर्त लॉकडाऊनच्या विरोधात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांशी तब्बल अर्धा तास चर्चा केली.
साताऱ्यात सततच्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याला चालना देण्यासाठी सध्या पुढील पाच दिवस लागू करण्यात आलेला लॉकडाऊन मागे घेण्यात यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांच्या बतीने करण्यात आली. शहरात सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही, त्यामुळे ठराविक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवावी लागत आहेत, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले. साताऱ्यात काय उपाययोजना करता येतील याची माहिती शेखर सिंह यांनी व्यापाऱ्यांकडून घेतली.
पुणे शहरात रस्त्याच्या दुतर्फा असणारी दुकाने आळीपाळीने उघडली जातात, तसा प्रयोग साताऱ्यात करणे शक्य आहे का, या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला फारशी पसंती देण्यात आली नाही. साताऱ्याचे नागरिक व व्यापारी यांनी वेळोवेळी लॉकडाऊनच्या दरम्यान प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे. प्रश्न केवळ पाच दिवसांचा आहे. पुढील महिन्यात या विषयावर व्यापारी वर्गाचा अभिप्राय घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
व्यापाऱ्यांची जिल्हा प्रशासनाशी मुद्देसूद चर्चा झाली. मात्र, कोणताही निर्णय घेण्यात त्यांनी असमर्थता दर्शविली. परिणामी सातारा शहरातील शंभरहून अधिक व्यापाऱ्यांनी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात बैठक बोलाविली आहे. जिल्हा प्रशासनाने जर लॉकडाऊन संदर्भात निर्णय न घेतल्यास मंगळवारपासून शहरातील सर्व दुकाने सरसकट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा व्यापाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
लॉकडाऊनचा विषय राजकीय वळणावर
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सातारा पुन्हा सुरू करण्याची मागणी शनिवारी केली. मात्र, जिल्हा प्रशासनाने पुन्हा पाच दिवसांसाठी लॉकडाऊन अंशतः शिथिल केला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीसुद्धा शहरातील दुकाने सकाळी नऊ ते पाच या वेळेत सुरू ठेवण्याची मागणी केली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचा हा निर्णय पालकमंत्र्यांशी बोलून लागू केल्याचे व्यापाऱ्यांना सांगितले होते. त्यामुळे लॉकडाऊनच्या प्रश्नावर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असे राजकीय वळण आल्याचे स्पष्ट झाले.